मुंबई : राज्यात गेले तीन दिवस घटलेल्या करोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ नोंदविण्यात आली आह़े गेल्या २४ तासांत राज्यात करोनाचे ४६ हजार ७२३ नवे रुग्ण आढळल़े दिवसभरात मुंबईत १६ हजार ४२० नवे रुग्ण आढळल़े
राज्यात गेल्या आठवडय़ात झपाटय़ाने रुग्णवाढ झाली होती. या तुलनेत गेले तीन दिवस दैनंदिन रुग्णसंख्या स्थिर होती़ मुंबईतील रुग्णवाढ मंदावल्याने राज्याची दैनंदिन रुग्णसंख्या फार वाढणार नाही, असा अंदाज वर्तविण्यात येत होता़ मात्र, बुधवारी ४६,७२३ नवे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली. राज्यातील करोना संसर्ग अद्याप कमी झालेला नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
मुंबईत बुधवारी आढळलेल्या १६ हजार ४२० रुग्णांपैकी ९१६ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील ९८ रुग्णांना प्राणवायूची गरज भासली.
राज्यात गेल्या २४ तासांत ३२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या २ लाख ४० हजार झाली. ओमायक्रॉनच्या नव्या ८६ पैकी ५३ रुग्ण हे पुणे शहरातील आहेत. राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनचे १३६७ रुग्ण आढळले आहेत.
ग्रामीण भागांवरही सावट
शहरांबरोबरच ग्रामीण भागांतही करोना रुग्णवाढ नोंदविण्यात येत आह़े दिवसभरात नाशिक जिल्हा १४५७, पुणे शहर ४९०३, उर्वरित पुणे जिल्हा १४११, पिंपरी-चिंचवड १९४७, सातारा ७०९, रत्नागिरी २६१, सिंधुदुर्ग १४६, औरंगाबाद शहर २६१, नागपूर शहर १२०७ नवे रुग्ण आढळले.
दिल्लीत रुग्णवाढ; २७,५६१ नवे बाधित
दिल्लीत बुधवारी करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदविण्यात आली़ दिवसभरात २७,५६१ रुग्ण आढळले, तर ४० जणांचा मृत्यू झाला़ दिल्लीत बाधितांचे प्रमाण २६़२२ टक्के आह़े मंगळवारी तिथे २१,२५९ रुग्ण आढळले होत़े त्या तुलनेत बुधवारी रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने दिल्ली सरकारची डोकेदुखी वाढली आह़े