लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई आणि परिसरात तीव्र उकाडा जाणवू लागला असून एका दिवसात तापमानात दोन अंशानी वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या सांताक्रुझ केंद्रात शनिवारी ३७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

एप्रिलच्या सुरुवातीपासूनच तापमानात वाढ झाली असून मुंबई आणि परिसरात दुपारी उन्हाचे चटके बसू लागले आहेत. वातावरणातील दाहकता वाढल्याने डोक्यावर टोपी किंवा रूमाल घेऊन मुंबईकर बाहेर पडताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दक्षिण मुंबईतील कमाल तापमान साधारण ३१ ते ३३ अंश सेल्सिअसदरम्यान आहे. मात्र त्याच वेळी पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये उन्हाची तीव्रता वाढली लागली आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कुलाबा केंद्रात कमाल तापमानात १.२ अंश सेल्सिअसने, तर सांताक्रुझ केंद्रात २ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. दरम्यान, पुढचे दोन-तीन दिवस तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

आणखी वाचा- ॲन्टॉप हिल येथे किरकोळ वादातून गोळीबार

दरम्यान, राज्यात उकाडा, ऊन आणि पाऊस अशी परिस्थिती दिसून येत आहे. पुढील चार दिवस राज्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे. विदर्भातील यवतमाळ आणि अमरावतीमध्ये रविवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच पुणे, नाशिक, सांगली आणि सातारा भागातही पावसाचा अंदाज आहे.