मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, ६ जून रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात ‘विकास २०२५’ या अखिल भारतीय तसेच विभागवार एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण व उद्योग क्षेत्रांमध्ये समन्वय साधणे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.

‘विकास २०२५’ परिषदेत स्वागतपर संबोधन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी करणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष प्रा. एम. जगदेश कुमार हे परिषदेच्या आयोजनामागील पार्श्वभूमी विशद करतील. उद्योग समन्वय प्रस्थापित करणे आणि अभ्यासक्रमाची सहनिर्मिती करणे यावर आयआयटी मुंबईचे प्रा. मिलिंद अत्रे, शिकाऊ उमेदवारी योजना तयार करणे आणि शिकाऊ उमेदवारी समाविष्ट पदवी कार्यक्रम (एईडीपी) कार्यान्वित करणेबाबत महिंद्रा अँड महिंद्राचे माजी समूह अध्यक्ष राजीव दुबे, अनुभवात्मक शिक्षणासाठी शिक्षकांना सक्षम करणे या विषयावर प्रा. उज्वला चक्रदेव, प्रादेशिक उद्योग, स्थानिक कौशल्यांच्या संदर्भानुसार उच्च शिक्षण संस्थांच्या कौशल्य धोरणाचे अनुकूलन यावर एईडीपी टास्क फोर्सचे भरत अंमळकर आणि प्राचार्य अनिल राव मार्गदर्शन करतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एईडीपीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाने तयार केलेला सविस्तर संरचनात्मक आराखडा आणि शिकाऊ उमेदवारी समाविष्ट पदवी कार्यक्रमांमध्ये उद्योगाचा सहभाग यावर मुंबई विद्यापीठातर्फे सादरीकरण केले जाणार आहे. ही परिषद सर्वांना मुंबई विद्यापीठाच्या @universityofmumbai_uom या अधिकृत युट्यूब वाहिनीवर लाईव्ह पाहता येईल. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मुख्य संबोधनाने परिषदेची सांगता होणार आहे.