मुंबई : मध्य रेल्वेवरील मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान सोमवारी झालेल्या दुर्घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. तसेच, ज्या लोकल डब्यामधून प्रवासी पडले, तो डबा कळवा कारशेडमध्ये रवाना करण्यात आला आहे. या डब्यामध्ये काही दोष आहे का, त्याची तपासणी करण्यात येणार आहे.
मुंब्रा येथील दुर्घटना वळणामुळे झाल्याची बाब समोर आली होती. परंतु, रेल्वे रूळाला सुमारे २.५ अंशाचे वळण असून यामुळे दुर्घटना झाली नसल्याची माहिती वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने दिली. तसेच घटनास्थळी रेल्वे रूळांच्या वळणाचे मोजमाप केले. यामध्ये रेल्वे रूळाचे वळण या घटनेला कारणीभूत नसल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. तसेच रेल्वे स्थानकामधील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रिकरणाची पाहणी केली असता, प्रवासी पडतानाचे चित्रिकरण झाले नसल्याचे तपासामध्ये अडचणी येत आहेत. मुंब्रा स्थानकातील फलाटावरील कॅमेऱ्यामध्ये लोकल येत असल्याचे दृश्य कैद झाले. त्यानंतर लोकलमधील प्रवासी रुळावर पडतानाचे दृश्य कैद झालेले नाही. यामुळे घटनेचे कारण समजण्यास अडथळा येत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. तसेच या दुर्घटनेतील लोकल डबा कळवा कारशेडमध्ये रवाना करण्यात आला आहे. या डब्यात काही तांत्रिक दोष होता का याची पाहणी करण्यात येणार आहे, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दिवा- मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून जखमी प्रवाशांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. गंभीर अवस्थेत असलेल्या दोनपैकी एका प्रवाशांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याने त्याची जीवन सुरक्षा प्रणाली (व्हेंटिलेटर) काढण्यात आली आहे. तर, एक प्रवासी अद्यापही जीवन सुरक्षा प्रणालीवर असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.