मुंबई– भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱया एका म्यानमार देशाच्या एका नागरिकाचे बिंग केवळ त्याला हिंदी भाषा येत नसल्याने फुटले. भारतात बेकायदेशीर प्रवेश केल्यानंतर तो नाव बदलून दिल्लीत राहात होता. बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पारपत्र मिळवून त्याने परदेश प्रवासही केला होता होता. परंतु विमानतळावरील अधिकाऱ्यांना त्याला केवळ हिंदी येत नसल्याने संशय आला आणि पुढील चौकशीत त्याचे पितळ उघड पडले.
नवी दिल्ली येथे राहणारा बोईलतुंग सायमन नावाचा एक प्रवासी रविवारी मलेशिया येथे जाण्यासाठी आला होता. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याची तपासणी सुरू होती. इमिग्रेशन अधिकारी दिलीप ठाकोर बोईलतुंग याच्या कागदपत्रांची तपासणी करत होते. बोईलतुंग हा दिल्लीत रहात असला तरी त्याचे जन्मस्थान मिझोरम राज्यातील एजवाल येथील असल्याचे पारपत्रावरून दिसून आले. ठाकोर यांनी त्याच्याकडे मिझोरम राज्याबद्दल प्राथमिक माहिती विचारली. मात्र त्याला काही सांगता आले नाही. त्यामुळे ठाकोर यांना आश्चर्य वाटले. तो केवळ इंग्रजीत संभाषण करत होता. प्रत्येकाला आपल्या मूळ गाव, राज्याबाबत किमान प्राथमिक तरी माहिती असते. पण बोईलतुंग याला काहीच माहिती नव्हती. त्यामुळे त्याला पुढीत चौकशीसाठी विंग प्रमुख सुरज जाधव आणि ड्युटी अधिकारी कमल भट्ट यांच्याकडे नेण्यात आले.
हिंदी न आल्याने बिंग फुटले
अधिकाऱ्यांपुढे तो इंग्रजीत बोलत होता. अधिकाऱ्यांनी त्याची पुन्हा सखोल चौकशी केली. कागदपत्रे, पारपत्र सारे काही हुबेहुब होते. संशयाला कुठेही वाव नव्हता. माझे जन्मस्थान मिझोरम राज्यातील असलं तरी मी दिल्लीतच रहातो असे त्याने सांगितले. पण त्याला अजिबात हिंदी येत नव्हते. दिल्लीत राहणाऱ्या व्यक्तीला तरी किमान प्राथमिक हिंदी बोलता येते. बोईलतुंग याला हिंदी येत नसल्याने त्याचे बिंग फुटले. अधिक चौकशीत त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली. त्याचे खरे नाव थांग सो ल्यान (३४) असे असून तो म्यानमार देशाचा नागरिक होता.
भारतात बेकायदेशीर प्रवेश, बनावट पारपत्र
थांग सो ल्यान याने २०१९ मध्ये म्यानमार सरकारच्या विरोधातील आंदोलनात भाग घेतला होता. त्यामुळे सरकारने त्याच्या विरोधात अटक वॉरंट काढले होते. अटक टाळण्यासाठी त्याने बेकायदेशीरपणे मिझोरममध्ये प्रवेश केला होता. तेथून तो दिल्लीत गेला आणि तेथेच राहू लागला. दिल्लीत असताना त्याने तालिब नावाच्या एका पारपत्र दलालाच्या मदतीने बनावट भारतीय पारपत्र बनवले होते.
त्याच्या विरोधात पारपत्र अधिनियमाच्या कलम १२ तसेच फसवणूक करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे आदींसाठी कलम भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८, ३३६ (२) ३३६ (४) आणि ३४० (२) अन्वये सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.