मुंबई : गेले दोन दिवस लागून सुट्टी आल्याने करोना चाचण्यांचे प्रमाण कमी होते, परिणामी रुग्णांच्या संख्येतही घट झाली होती. मात्र, बुधवारी चाचण्यांचे प्रमाण वाढल्यानंतर करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून ९७५ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर दोघांचा मृत्यू झाला.

  २४ तासांत ८ हजार १७३ करोना चाचण्या करण्यात आल्या. नव्याने आढळलेल्या ९७५ रुग्णांपैकी ९४ टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. ५९ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सध्या एकूण ४१८ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. त्यातील १५ रुग्ण प्राणवायू सुविधा असलेल्या खाटांवर उपाचार घेत आहेत. बुधवारी मृत्यू झालेल्या ७४ वर्षीय पुरुष रुग्ण आणि ५९ वर्षीय महिला रुग्णाला दीर्घकालीन आजार होता. दिवसभरात ८५० रुग्ण करोनामुक्त झाले असून बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ९७.८ टक्के   आहे.

ठाणे जिल्ह्यात २२७ बाधित

ठाणे : ठाणे जिल्ह्यात बुधवारी २२७ नवे करोना रुग्ण आढळले. या रुग्णांपैकी ठाणे ८२, नवी मुंबई ५९, कल्याण डोंबिवली ३७, मीरा भाईंदर २३, उल्हासनगर १०, ठाणे ग्रामीण १०, बदलापूर चार आणि भिवंडी पालिका क्षेत्रात दोन रुग्ण आढळले. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ६०६ आहे.