मुंबई : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रेल्वे प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढला होता. याप्रसंगी रेल्वे स्थानकांच्या आवारातील खाद्यपदार्थ व वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉल्स हटविण्याची प्रमुख मागणी मनसे नेते अविनाश जाधव यांच्याकडून करण्यात आली. मात्र अविनाश जाधव यांचे वक्तव्य संतापजनक व संपूर्णतः चुकीचे असल्याचे वृत्तपत्र विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मनसेच्या भूमिकेच्या निषेधार्थ वृत्तपत्र विक्रेत्यांनी बुधवार, ११ जून रोजी दुपारी ठाणे स्थानकाबाहेर निदर्शने करून निषेध नोंदवला.

मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील अपघातात ठार झालेल्या, तसेच जखमी प्रवाशांबद्दल वृत्तपत्र विक्रेते संवेदनशील आहेत. परंतु या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अविनाश जाधव यांनी रेल्वे स्थानकातील वृतपत्र विक्रीचे स्टॉल उखडण्याची केलेली भाषा अशोभनीय व अव्यवहार्य आहे. मनसेच्या या मागणीमुळे सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सध्या वृत्तपत्र विक्री या एकमेव व्यवसायातच मराठी टक्का टिकला असून अविनाश जाधव यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवल्याची भावना वृत्तपत्र विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात दिलीप चिंचोले, वैभव म्हात्रे, विवेक इसामे, निलेश कदम,संतोष शिंदे, केशव शिर्के, जितेंद्र क्षिरसागर, संदीप आवारे यांच्यासह अनेक वृत्तपत्र विक्रेते सहभागी झाले होते. यावेळी दत्ता घाडगे यांनी मराठी माणसाच्या व्यवसायावर गदा आणण्याच्या मनसेच्या कृतीबाबत मनसे नेतृत्वालाही जाणीव करून दिली आणि अविनाश जाधव यांच्या वक्तव्याबद्दल त्यांना योग्य समज देण्याची मागणी केली.