मुंबई : हवामान विभागाने मुंबईत शुक्रवारी वळीवाच्या पावसाची शक्यता वर्तविली होती. मात्र, मुंबई आणि उपनगरांत दिवसभर कुठेही पाऊस पडला नाही. याउलट मुंबईकर असह्य उकाड्याने हैराण झाले होते. दरम्यान, पुढील दोन दिवस मुंबईत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबईकरांना उन्हाचे चटके आणि असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. जून महिना उजाडला तरी परिस्थिती जैसे थे आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई आणि उपनगरांत वळीवाच्या पावसाने हजेरी लावली होती. तेवढ्यापुरते वातावरणात गारवा निर्माण होऊन काहीसा दिलासा मिळाला. मात्र, पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली. काही भागात दिवसभर ढगाळ वातावरणामुळे उकाडा सहन करावा लागतो, तर काही भागात सकाळी १० वाजल्यानंतर उन्हाचे चटके सोसावे लागतात. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ३४ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३५.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत सोमवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर मंगळवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात मोसमी वारे दाखल झाले आहेत. पुढील तीन – चार दिवसांत मोसमी वारे मुंबईत दाखल होतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मोसमी वाऱ्यांनी गुरुवारी राज्यात प्रवेश केल्यानंतर शुक्रवारी पुढील वाटचाल केलेली नाही. मात्र, मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.

हेही वाचा – मुंबई : पदवीच्या अंतिम सत्राच्या २२ परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर

हेही वाचा – ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ला दहा वर्षे पूर्ण, आतापर्यंत ९७ कोटी प्रवाशांनी केला प्रवास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, सोलापूर, सांगली, परभणी या भागातही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, रविवार ते मंगळवार या कालावधीत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.