भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये भगवद्गीतेचं पठण करण्यास मान्यता देण्याची मागणी केलीय. तसेच आपल्या शाळेत भगवद्गीतेचं नाही, तर मग फतवा-ए-आलमगिरीचं पठण झालं पाहिजे का? असा सवाल केलाय. या मुद्द्यावर नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पालिकेला आदेश देण्याची मागणी केली. नितेश राणे म्हणाले, "मुंबई महापालिकेत भाजपाच्या योगिता कोळी यांनी महापालिका शाळेत भगवद्गीता पठण व्हावं असा प्रस्ताव महापौरांसमोर मांडला. या प्रस्तावाला समाजवादी पक्षाने विरोध केला. हिंदू राष्ट्र असलेल्या आपल्या देशात भगवद्गीतेच्या पठणाला असा विरोध होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. भगवद्गीतेला जगभरात मान्यता आहे. आपल्या शाळांमध्ये भगवद्गीतेचं पठण करायचं नाही, मग फतवा-ए-आलमगिरीचं पठण झालं पाहिजे का?" हेही वाचा : “मी मंत्री असताना नितेश राणेंची तपासणी करुन पुन्हा जेलमध्ये पाठवलं होतं, आता…”, दीपक केसरकरांचा घरचा आहेर "हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र म्हणून आम्ही आपल्याकडून अपेक्षा ठेवतो की भगवद्गीतेचं पठण महापालिका शाळांमध्ये होण्यासाठी योगिता कोळी यांनी मांडलेल्या प्रस्तावाला मान्यता देण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावेत," अशी मागणी नितेश राणे यांनी केली.