मुंबई : महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी महाराष्ट्र व इतर राज्यांतून चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांना विविध सामाजिक संस्थांमार्फत अन्नदानाचे वितरण करण्यात येते. अन्नदान वितरणसाठी इच्छुक संघटना, संस्था, व्यक्ती आदींनी ‘जी उत्तर’ विभागातील सहायक अभियंता परिरक्षण व दादरमधील शिवाजी पार्क येथील पोलिस स्थानकात ४ डिसेंबर पूर्वी लेखी स्वरुपात अवगत करावे, असे आवाहन ‘जी उत्तर’ विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी केले आहे.

हेही वाचा… ‘सीएसएमटी’ ते नागपूर, सोलापूर विशेष रेल्वे

हेही वाचा… तृतीयपंथीयांसाठी आरक्षणाचे आदेश देणे शक्य नाही! ‘मॅट’चे स्पष्टीकरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे अनुयायांची मोठी गर्दी होते. यावेळी नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी महानगरपालिका दरवर्षी विविध उपाययोजना करत असते. यंदाही पालिका प्रशासनाने शिवाजी पार्क, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह यासह आवश्यक त्या विविध ठिकाणी सुसज्ज नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध संघटना, संस्था यांच्यातर्फे अनुयायांना अन्नदानाचे वाटप केले जाते. प्राचार्य एम. एम. पिंगे चौक, छत्रपती शिवाजी महाराज मैदान, विष्णू निवासालगतचा एस. एच. परळकर आणि पद्माबाई ठक्कर मार्ग आदी चार ठिकाणी अनुयायांना अन्नदान वितरण करता येणार आहे. यासाठी संबंधित संघटना, संस्था, व्यक्तींनी महानगरपालिकेचा ‘जी उत्तर’ विभाग व छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील पोलिस ठाण्याला ४ डिसेंबर पूर्वी लेखी स्वरुपात अवगत करावे. जेणेकरुन महानिर्वाणदिनी अन्न सुनियंत्रित पद्धतीने वितरण करणे, वितरणाकरीता येणा-या वाहनांचे नियंत्रण करणे, तसेच सुयोग्य प्रकारे कचरा संकलन करणे आदींचे नियोजन व अंमलबजावणी करणे शक्य होईल, असे आवाहन प्रशांत सपकाळे यांनी केले आहे.