मुंबई : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने भामला फाउंडेशन, गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप आणि रावीन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक प्रदूषणावर जनजागृती करण्यासाठी ‘अर्थिंग’ आणि ‘प्यास’ हे दोन माहितीपट तयार करण्यात आले आहेत. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी हे माहितीपट प्रदर्शित करण्यात आले.

पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साठू लागले की प्रशासनावर टीका केली जाते. पण काही नागरिक आपल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करतात. रस्त्यावर अन्नपदार्थ वा कचरा भरलेल्या प्लास्टिक पिशव्या रस्त्यावरच फेकण्यात येतात आणि अन्नपदार्थांसह पिशव्या प्राणी खातात.प्लास्टिक नष्ट होत नाही. त्यामुळे हेच प्लास्टिक प्राण्यांच्या पोटात अडकून राहते. त्यामुळे प्राण्यांचा जीवन धोक्यात येतो. अनेकदा घशात अथवा श्वास नलिकेत प्लास्टिक अडकून प्राण्याचा मृत्यूही होऊ शकतो. जमिनीत अथवा पाण्यात प्लास्टिक नष्ट होत नाही. प्लास्टिक जाळले तर हवेत प्रदूषण होते. प्लास्टिकमध्ये विविध घातक रसायने असतात. मानवाला ते धोकादायक ठरू शकते. जमीन तसेच पाण्यातही ते हानीकारक ठरते.

पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अन्वये शासनाने ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर (वापर आणि विक्री) बंदी घातली आहे. हे माहिती असूनही त्यापेक्षा कमी जाडीच्या पातळ प्लास्टिकच्या पिशव्यांची निर्मिती व विक्री करण्यात येत आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिकेच्या सहकार्याने भामला फाउंडेशन, गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप आणि रावीन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्यासाठी ‘अर्थिंग’ आणि ‘प्यासा’ हे माहितीपट प्रदर्शित केले आहेत. या माहितीपटात अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री शर्वरी वाघ प्रमुख भूमिकांमध्ये असून,दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी माहितीपट दिग्दर्शित केले आहेत.

प्रशासनाकडून बंदी योग्य प्लास्टिकच्या पिशव्यांवर कारवाई करण्यात येते. काही दिवस ही मोहीम धडाक्यात सुरू असते. अचानक ती थांबते. थातूरमातूर कारवाई होत असल्याने कुणीच ही बाब गंभीरतेने घेत नाही. प्लास्टिकच्या पिशव्यांचा अनावश्यक वापरामुळे मानवी आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे कितीही कारवाई, बंदी आणली तरी हा वापर पूर्णपणे बंद होऊ शकत नाही. याउलट नागरिकांनीच स्वतःहून प्लास्टिकच्या वस्तू वापरणे थांबवले तर मानवी आरोग्यावर त्याचे सकारात्मक परिणाम कसे होतात आदी बाबींवर या माहितीपटात प्रकाशझोत टाकण्यात आला आहेत.

दरम्यान, खार (पश्चिम), येथील पालिकेच्या एच-पश्चिम विभाग कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला पालिका आयुक्त भूषण गगराणी, चित्रपट निर्माते रोहित शेट्टी, अभिनेते इम्तियाज अली, अभिनेता अजय देवगण आणि शर्वरी वाघ, रावीन ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय कारिया आणि भामला फाउंडेशनचे आसिफ भामला उपस्थित होते.दरम्यान, एकल वापर प्लास्टिक म्हणजेच प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तू, ज्यांचा वापर एकदाच करता येतो, या प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. बंदी घातलेल्या उत्पादनाची निर्मिती किंवा विक्री केल्यास पर्यावरण कायदा कलम १५ अंतर्गत ७ वर्षांचा तुरुंगवास आणि १ लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जोपर्यंत आपण प्लास्टिकचा वापर वैयक्तिक पातळीवर बंद करणार नाही तोपर्यंत प्लास्टिक प्रदूषण विळखा राहणार. सध्या आपल्या पर्यावरणीय समस्या भेडसावत आहेत. यावर आपण वेळीच पाऊल उचलायला हवीत. भूषण गगराणी, आयुक्त, मुंबई महानगरपालिका