मुंबई: राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ ऑनलाईन पद्धतीने आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला.

आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई येथे आयोजित या राज्यस्तरीय कार्यक्रमात आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक अमगोथू श्री रंगा नायक, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक डॉ. स्वप्नील लाळे, सहसंचालक, उपसंचालक व राज्यस्तरीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यातील सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व संबंधित अधिकारी, जिल्ह्यांमध्ये कार्यरत थॅलेसेमिया सोसायटी, थॅलेसेमिया रुग्ण व त्यांचे नातेवाईक ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमाला उपस्थित होते. आरोग्यमंत्री आबिटकर यांच्या हस्ते थॅलेसेमिया रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्रांचे प्रातिनिधिक वितरण यावेळी करण्यात आले.

थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र करण्याच्या दिशेने गुरुवारपासूव सुरु झालेले हे अभियान अतिशय महत्त्वाचे आहे. राज्यात सुमारे 12,000 थॅलेसेमिया रुग्ण आहेत. या आजाराच्या रुग्णाच्या कुटुंबियांना अनेक प्रकारच्या मानसिक व आर्थिक समस्याना सामोरे जावे लागते. हा आजार गंभीर असून महाराष्ट्र शासन थॅलेसेमिया रुग्णांच्या पाठीशी राहील. त्यांना चांगल्या दर्जाची औषधे, उपचार, वैद्यकीय मार्गदर्शन व प्रबोधन करण्यात येईल. महाराष्ट्रातील थॅलेसेमिया रुग्णांचा आकडा वाढू नये तसेच सध्या असलेल्या रुग्णांचे प्रमाण कमी करून थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र करण्याच्या प्रयत्नांची ही सुरवात झाली असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.

थॅलेसेमिया आणि अशाच प्रकारच्या दुर्मिळ आजारांचे संशयित रुग्ण शोधणे हे एक आव्हानात्मक काम आहे. त्यामुळे सर्वप्रथम असे रुग्ण शोधण्याची मोहीम हाती घेण्याची गरज आहे. विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याने त्यासाठी आपले योगदान दिले तर भविष्यात अशा प्रकारचा आजार असेलेल्या रुग्णांची संख्या निश्चितच कमी होईल. त्या दृष्टीने नियोजन करून विभागातील अधिकाऱ्यांनी योजना आणि मोहीम आखावी आणि महाराष्ट्र निरोगी करण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहनही आरोग्यमंत्री आबिटकर यांनी यावेळी केले.

आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, थॅलेसेमिया हा अनुवांशिक, गंभीर व खर्चिक आजार आहे. या आजाराबाबत समाजात प्रबोधन करणे गरजेचे आहे. विभागातील कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे काम केले तर राज्यातील थॅलेसेमियाच्या रुग्णांची संख्या आपण निश्चितच कमी करू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने थोडा वेळ आरोग्यासाठी देण्याची आवश्यकता आहे. थॅलेसेमियाच्या रुग्णांना शोधणे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे. त्यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे थॅलेसेमिया या आजाराविषयी लग्नाआधीच समुपदेशन केले तर रुग्णांची संख्या कमी करण्यात आपल्याला यश मिळेल. परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांनी थॅलेसेमिया रुग्णांसाठी चांगले काम केले आहे. असेच काम सर्वांनी सर्वांनी करण्याची गरज आहे.

आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक अमगोथू श्री रंगा नायक म्हणाले की, थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्रासाठी आधी संशयित रुग्णांची तपासणी करण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी थॅलेसेमिया या आजाराविषयी व्यापक जनजागृती करावी लागेल. रुग्णांची तपासणी, निदान आणि उपचार या सर्वांचे मॉनिटरिंग करण्याची गरज आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परभणी येथील थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपच्या http://www.thalassemiasupport.com या संकेतस्थळाचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. यावेळी श्री. लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांची थॅलेसेमिया राज्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ या अभियानांतर्गत सर्व जिल्ह्यांमध्ये थॅलेसेमिया आजारांची रुग्णसंख्या विचारात घेऊन आवश्यकतेनुसार एचएलए शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत थॅलेसेमिया आजारासंबंधी प्रभावी जनजागृती करण्यात येणार आहे. थॅलेसेमिया आजारासंबंधी अधिक माहितीसाठी १०४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. विवाह करणारे जोडीदार हे थॅलेसेमिया आजाराचे वाहक असल्यास त्यांना होणाऱ्या अपत्याची थॅलेसेमिया आजारासंबंधी तपासणी करणे आवश्यक असून सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये ही चाचणी मोफत उपलब्ध आहे.