मुंबई : राज्यात आतापर्यंत अतिवृष्टीमुळे १०४ नागरिकांनी आपला जीव गमावला असून १८९ प्राणी दगावले आहेत. ठिकठिकाणी ७३ तात्पुरती निवारा केंद्रे उभारण्यात आली असून आतापर्यंत ११ हजार ८३६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.  कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २०.१ मिमी पावसाची नोंद झाली असून सद्य:स्थितीत पूरपरिस्थिती नाही, मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत आहे.

वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई -गोवा महामार्गावरील परशुराम घाटात ३० जुलैपर्यंत सकाळी ६ पासून ते सायंकाळी ७ पर्यंत अवजड वाहनांची एकेरी वाहतूक सुरू राहील. सायंकाळी ७ ते सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद राहील. तसेच राजापूर- कोल्हापूर यांना जोडणारा अनुस्कुरा घाटातील दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये २० मिमी पाऊस झाला असून जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता व वर्धा या नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत. गोदावरी नदी व इंद्रावती नदी या धोका पातळीच्या वर वाहत आहेत. या नद्या तुडुंब भरल्याने अनेक मार्ग खंडित झाले असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सध्या १० हजार ६०६ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांची व्यवस्था ३५ मदत केंद्रांत करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लक्ष्मी बंधारा (मेडीगड्डा) चे ८५ पैकी ८५ दरवाजे उघडलेले आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १३ तुकडय़ा तैनात आहेत. तर नांदेड व गडचिरोली येथे प्रत्येकी एक अशा राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) एकूण दोन तुकडय़ा तैनात आहेत.