मुंबई : रेल्वे प्रवासाची आरक्षित तिकिट मिळविण्यासाठी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या नावाच्या बनावट पत्राचा गैरवापर केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खासदारांसाठी भारतीय रेल्वेमध्ये प्रवासासाठी विशिष्ट कोटा राखीव असतो. खासदारांकडून त्यांच्या अधिकृत लेटरहेडवर शिफारस पत्र दिल्यास संबंधित प्रवाशाला रेल्वेमध्ये तिकिट आरक्षित करून दिले जाते. मध्य रेल्वेच्या आरक्षण विभागाच्या सहाय्यक व्यवस्थापांना ३० मे रोजी भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी पाठवलेले एक शिफारस पत्र मिळाले. रेल्वे कन्फर्मेशनच्या ड्रॉप बॉक्स मध्ये हे पत्र टाकण्यात आले होते. ते रेल्वे मंत्री अश्वीनी वैष्णव यांच्या नावाने होते. सईद एझाज या व्यक्तीला मुंबई – नांदेड प्रवासासाठी ३१ मे रोजीच्या सेवाग्राम एक्स्प्रमेसमधील वातानुकूलीत श्रेणीची दोन तिकिटे खासदार कोट्यातून आरक्षित करण्यात यावी अशी शिफारस या पत्रात करण्यात आली होती. रेल्वेला या पत्राबाबत संशय आल्याने त्यांनी खासदार म्हात्रे यांचे स्वीय सहाय्यक आकाश पाटील यांच्याशी संपर्क साधला.
या पत्रात खासदार म्हात्रे यांची सही बनावट होती. तसेच पत्रातील मजूकर स्वहस्ताक्षरात होता. खासदार म्हात्रे यांच्या पत्रातीत स्वाक्षरी वगळता कुठलाही मजूकर हा स्वहस्ताक्षरात नसतो. ३० मे रोजी खासदार म्हात्रे परदेशात होते. पत्रावरील आवक-जावक क्रमांकही चुकीचा होता. त्यामुळे हे पत्र बनावट असल्याचा संशय वाढला. परदेशातून परतल्यानंतर खासदार म्हात्रे यांना हे पत्र दाखवले असता त्यांनी स्वाक्षरी त्यांची नसून पत्र बनावट असल्याचे सांगितले.
याप्रकरणी स्वीय सहाय्यक आकाश पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी सईज एझाज याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३३६ (२), ३३६ (३) आणि ३४० (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.