मुंबई : उत्तर मुंबईतील जीर्ण मंदिरांबाबतचा प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच एक समिती स्थापन केली जाईल अशी घोषणा केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबई मतदारसंघाचे खासदार पियुष गोयल यांनी केली. या कामासाठी मंदिरांबाबतची माहिती संकलित करण्यात येणार असून या कामासाठी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मदत करावी असेही आवाहन गोयल यांनी यावेळी केले.

मालाड ते बोरिवली परिसराचा समावेश असलेल्या उत्तर मुंबई मतदारसंघाचे खासदार पियुष गोयल यांनी रविवारी जनता दरबार आयोजित केला होता. कांदिवली पश्चिमेकडील लोककल्याण कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या जनता दरबारात केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी दृकश्राव्य माध्यमातून उपस्थिती लावत जनतेच्या समस्या एकून घेतल्या. महापालिका, एसआरए, म्हाडा, वनविभाग, रेल्वे, रस्तेवाहतूक यांबाबतच्या प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. जनता दरबारात सुमारे ३५ विषय मांडण्यात आले. या जनता दरबार कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. त्यांनी मंदिरांविषयीचे काही मुद्दे उपस्थित केले. त्यावर गोयल यांनी समिती स्थापन करण्याची घोषणा केली.

या जनता दरबार कार्यक्रमाला मालाड आंबोजवाडी येथील विहिंपचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी यावेळी सांगितले, मालाडमध्ये काही मंदिरांच्या आजूबाजूने अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. काही मंदिराच्या आजूबाजूला मांसाहाराची दुकाने आहेत, काही मंदिरे जीर्ण अवस्थेत आहेत, तर काही मंदिरांना टाळे असते तिथे रोजची पूजाही होत नाही. तेव्हा पियुष गोयल म्हणाले, उत्तर मुंबईतील जेवढी मंदिर जीर्ण झाली आहेत. या मंदिरांबाबत असलेल्या समस्या निवारण्यासाठी एक समिती स्थापन करून मंदिरांचे प्रश्न मार्गी लावता येतील. एखाद्या मंदिराचा जीर्णोद्धार करणे, मंदिराला पुजारी उपलब्ध करून देणे अशा स्वरुपाची मदत करता येईल. तसेच या कामासाठी विश्व हिंदू परिषदेने मदत करावी, असेही पीयूष गोयल यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तर मुंबईतील रहिवाशांचे रखडलेले पुनर्वसन, महापालिकेने दुकाने व घरांवर केलेली तोडक कारवाई, अनधिकृत बांधकामे, विकासकांची मनमानी, शाळकरी मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, मंदिरांचे जीर्णोध्दार व इतर समस्या, कोळी बांधवांच्या समस्या, बारमालकांचा त्रास, मुलांना खेळण्यासाठी मैदानाची सोय, आरोग्याच्या समस्या इ. विषयांवर विस्तृत चर्चा झाली. या विषयांवर केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी काही प्रश्न हे थेट संबंधीत विभागाच्या अधिकारांशी फोनवर चर्चा करून सोडविल्या. काही प्रश्न संबंधित विभागाच्या कार्यालयात भेट देऊन सोडवा, असे निर्देश गोयल यांनी अधिकाऱ्यांनी दिले.