मुंबई : नदी, नाल्यांत कचरा टाकू नये असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनातर्फे वारंवार करण्यात येत आहे. मात्र पोलिसांनीच या आवाहनाला हरताळ फासला आहे. पुलाखाली कोणी तरी टाकलेला जुना सोफा पोलिसांनी उचलून दहिसर नदीत टाकल्याची घटना समाजमाध्यमांवर उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुंबई महापालिका प्रशासनाने मुंबई पोलिसांनाही जाहीरपणे समज दिली आहे.
पावसाळ्यात मुंबईत पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मुंबई महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्चून नदी, नाल्यातील गाळ काढण्याचे काम करते. तरीही या नदी नाल्यांवर तरंगणाऱ्या कचऱ्याची समस्या काही सुटत नाही. नदी नाल्यात कचरा टाकू नये, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासन वारंवार करीत असते. मात्र तरीही झोपडपट्ट्यांमधून नदी, नाल्यांमध्ये कचरा फेकण्यात येतो. हाच कचरा पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये अडकतो व त्यामुळे मुंबईत पाणी तुंबते. त्यामुळे नदी, नाल्यात कचरा टाकू नये, असे आवाहन पालिका प्रशासन करीत असते. मात्र प्रत्यक्ष मुंबई पोलिसांनीच पालिका प्रशासनाच्या या आवाहनाला हरताळ फासल्याची घटना समाजमाध्यमांवर उघडकीस आली आहे.
पोलिसांबाबत पालिकेकडे तक्रार
दहिसरच्या उड्डाणपुलाखाली कोणी तरी टाकून दिलेला जुना सोफा पुलावरून नदीत फेकतानाची पोलिसांची ध्वनिचित्रफित समाजमाध्यमांवरून टाकण्यात आली आहे. दहिसर अग्निशमन केंद्रापासून जवळच ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी नदीत सोफा टाकल्याची तक्रार काही नागरिकांनी पालिकेच्या आर उत्तर विभाग कार्यालयाकडे केली. मुंबई महापालिका प्रशासनाने या तक्रारीची दखल घेतली असून पोलिसांनाही जाहीरपणे समज दिली आहे. मुंबई पोलिसांनी अशा प्रकरणात मुंबई महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाला कळवावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाने दहिसर नदीच्या पात्रात उतरून हा सोफा बाहेर काढला. तसेच अशा प्रकारचा जुना अवजड कचरा नदी नाल्यात टाकू नये, असेही आवाहन केले आहे. असा जुना अवजड कचरा रस्त्यावर कुठे टाकल्याचे दिसल्यास त्याबाबतची तक्रार मुंबई महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयात करावी, असे आवाहनही पालिका प्रशासनाने केले आहे.
नाल्यात फेकण्यात येणाऱ्या कचऱ्याची समस्या सुटेना
नाल्यात फेकण्यात येणारा कचरा ही मुंबई महापालिकेसाठी न सुटणारी समस्या आहे. नालेसफाई करताना त्यात प्लास्टिकच्या पिशव्या, गाद्या, उषा, लाकडी सामान, कपडे, चिंध्या, खाऊची वेष्टने, थर्माकोल, राडारोडा आदी कचरा सापडतो. या कचऱ्यामुळे नद्या प्रदूषित होतातच, पण पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. पावसाचे पाणी उपसून समुद्रात टाकण्यासाठी मुंबई महापालिकेने उदंचन केंद्र उभे केले आहेत, त्यात हा कचरा अडकून हे पंप बंद पडण्याच्या घटनाही घडतात.