मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप असलेले नागपूर येथील पत्रकार प्रशांत कोरटकर यांच्या अटकपूर्व अर्जावरील सुनावणी उच्च न्यायालयाने सोमवारी ठेवली. न्यायालयाने त्यांना तोपर्यंत अटकेपासून संरक्षणही दिलेले नाही.

कोल्हापूर सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कोरटकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्यासमोर शुक्रवारी प्राथमिक सुनावणी झाली. त्यावेळी, याचिकेची प्रत आपल्याला उपलब्ध झालेली नसल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर, न्यायालयाने याचिकेची प्रत सरकारी वकिलांना उपलब्ध करण्याचे आदेश देऊन प्रकरणाची सुनावणी सोमवारी ठेवली.

दरम्यान, कोरटकर यांना सत्र न्यायालयाने आधी अटकेपासून अंतरिम दिलासा दिला होता. परंतु, पोलिसांची बाजू न ऐकताच कोरटकर यांना अटकेपासून अंतरिम दिलासा दिला होता, असा दावा करून सरकारने कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, कोरटकर यांना मंजूर केलेला अटकपूर्व जामीन रद्द करण्याची मागणी केली होती. कोरटकर तपासात सहकार्य करत नाहीत आणि तपास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे टाळत आहेत. त्यामुळे, तपासात अडथळे निर्माण होत असल्याचा दावाही सरकारने ही मागणी करताना केला होता. राज्य सरकार आणि पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले होते.

कोल्हापूरचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी कोरटकर यांना अटकेपासून दिलासा देताना काही अटी घातल्या होत्या. त्यानुसार, कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात बोलावले जाईल तेव्हा उपस्थित राहावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते. तसेच, अटकेपासून दिलासा मिळाल्यापासून ४८ तासांच्या आत नागपूर येथील सायबर विभागाकडे भ्रमणध्वनी स्वाधीन करण्याची अटही न्यायालयाने घातली होती. तथापि, कोरटकर यांच्याकडून या दोन्ही अटींची पूर्तता करण्यात आलेली नाही. याउलट, त्यांनी पत्नीच्या माध्यमातून त्यांचा भ्रमणध्वनी पोलिसांकडे स्वाधीन केला होता. त्यामुळे, सत्र न्यायालयाने कोरटकर यांना दिलेला दिलासा रद्द करावा, अशी मागणीही सरकारने केली होती.

उच्च न्यायालयाने सरकारची बाजू ऐकल्यानंतर, कोरटकर यांना दिलेल्या अंतरिम संरक्षणाची मुदत संपत आली आहे. त्यामुळे, या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी घेऊन अंतिम निर्णय देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने कोल्हापूर सत्र न्यायालयाला दिले होते. त्यानुसार, सत्र न्यायालयाने कोरटकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेतली होती व त्यावर निर्णय देताना तो फेटाळला होता. त्यानंतर, कोरटकर यांनी अटकेच्या भीतीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे व अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकरण काय ?

सावंत यांनी छावा चित्रपटावर आपली भूमिका मांडली होती. ही भूमिका मांडत असताना त्यांनी ब्राह्मण समाजाचा द्वेष केल्याचा आरोप करून कोरटकर यांनी फोन करून थेट धमकी दिली, असा दावा सावंत यांनी केला आहे. याबाबत सावंत यांनी एक कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवर प्रसिद्ध केली. त्यात, जिथे असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा, असे म्हणत या कोरटकर यांनी सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि घरात येऊन मारण्याची दिली धमकी दिली आहे. यानंतर कोरटकर यांच्याविरूद्ध कोल्हापूर येथील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे, अटक टाळण्यासाठी कोरटकर यांनी सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्ल जामिनाची मागणी केली होती.