मुंबई : राज्यात सर्वदूर पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मे महिन्याच्या सरासरीपेक्षा दहा पटीने जास्त पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतशिवारात चिखल साचला आहे. त्यामुळे खरीप हंगाम पूर्व मशागतींचा खोळंबा झाला आहे. आता मशागत न करता वाफसा आल्यानंतर पेरणी करावी लागणार आहे. काळ्या, खोल जमिनीत पेरणी योग्य वाफसा येण्यासाठी किमान दहा ते पंधरा दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या पुढेही पाऊस सुरू राहिला तर पेरण्या लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासून वळीव आणि शेवटच्या आठवड्यात पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ घातला आहे. सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मे महिन्यातील सरासरी पावसापेक्षा दहा पट जास्त पाऊस पडला आहे. मे महिन्यात राज्यात सरासरी १७.७ मिलीमीटर पाऊस पडतो, यंदा १७४.८ मिलीमीटर म्हणजे सरासरी ९८७.६ टक्के जास्त पाऊस पडला आहे. अति मुसळधार पावसामुळे मे महिन्यातच ओढे, नाले, बंधारे, तलाव भरून वाहू लागले आहेत. काळ्या, खोल जमिनीत चिखल साचला आहे.
मे महिना खरीप पेरणी पूर्व मशागतींचा असतो. शेतकरी पहिला वळीव पाऊस झाल्यानंतर मशागतींना सुरुवात करतात. पूर्व मशागती पिकांच्या वाढीसाठी गरजेच्या असतात. मात्र, पूर्व मशागतींच्या काळात राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे राज्याच्या बहुतेक भागांत पूर्व मशागतींचा खोळंबा झाला आहे. पाऊस कमी होऊन उन्ह पडले तरीही पेरणी योग्य वाफसा येण्यासाठी दहा ते पंधरा दिवसांची वाट पहावी लागणार आहे. वाफसा आल्यानंतर पूर्व मशागती न करता थेट पेरण्या कराव्या लागणार आहेत.
पंधरा जून ते पाच जुलै पेरण्यांचा मुख्य हंगाम
राज्यात दरवर्षी सरासरी सात जूनपासून पेरण्या सुरू होऊन जुलैअखेरपर्यंत पेरण्या सुरू राहतात. पण, १५ जून ५ जुलै, हा पेरण्यांचा मुख्यकाळ असतो. या वीस दिवसांत बहुतेक पेरण्या पार पडतात. त्यामुळे तातडीने पाऊस थांबला तरीही आठवडभर विलंबाने पेरण्या सुरू होतील. पावसाची संततधार कायम राहिल्यास पेरण्या अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.