मुंबई : राज्यात रब्बी हंगामातील पेरण्या गतीने सुरू आहेत. गुरुवारपर्यंत (२८ नोव्हेंबर) रब्बी पेरण्यांनी ६५.२५ टक्क्यांवर झेप घेतली आहे. राज्यात रब्बी हंगामातील सरासरी पेरणी क्षेत्र ५३.९६ लाख हेक्टर असून, त्यापैकी ३५ लाख २१ हजार ६५५ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. यंदा पाण्याची उपलब्धता चांगली असल्यामुळे पेरणी क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारपर्यंत राज्यातील रब्बी पेरण्या ६५.२५ टक्क्यांवर गेल्या आहेत. रब्बीचे सरासरी क्षेत्र ५३ लाख हेक्टर आहे, त्यापैकी ३५,२१,६५५ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. नागपूर विभागात २९.४६, अमरावती विभागात ७७.६५ टक्के, लातूर विभागात ८७.१६ टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात ८०.०६ टक्के, कोल्हापूर विभागात ६२.९८ टक्के, पुणे विभागात ५५.१५ टक्के, नाशिक विभागात २५.१७ टक्के, कोकण विभागात १०.३१ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

हेही वाचा : वैमानिक तरूणीचा मृत्यू : आत्महत्येपूर्वी आरोपी मित्राला व्हिडिओ कॉल

उसाचा गळीत हंगाम लाबल्याचा फटका पेरण्यांना बसला आहे. दरवर्षी एक नोव्हेंबरपासून हंगाम सुरू होतो, यंदा नोव्हेंबर अखेरपर्यंत गळीत हंगामाने गती घेतलेली नाही. पाण्याची उपलब्धता असलेली आणि सिंचनाची सोय असलेल्या ठिकाणी शेतकरी उसाची तोडणी झाल्यानंतर मका, गहू, हरभऱ्यासह कमी काळात येणाऱ्या कडधान्यांची लागवड करतात. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना ऊस तोडणीची प्रतिक्षा आहे. राज्यात तोडणी योग्य उसाखालील क्षेत्र सुमारे १२ लाख हेक्टर आहे, त्यामुळे ऊसतोडणी होईल तशी, रब्बी पेरण्यांमध्येही वाढ होणार आहेत. परिणामी जानेवारी अखेरपर्यंत राज्यात रब्बी पेरण्या होणार आहेत.

जवस उरले औषधापुरते

राज्यात जवस लागवडीखालील क्षेत्र १२,१४६ हेक्टर होते. यंदा आजवर जेमतेम ११९१ हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या १० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. औषधी गुणधर्म जास्त असल्यामुळे जवसाचा आहारात समावेश करण्याच्या सूचना आहारतज्ज्ञ देत असतात. पण, राज्यात दिवसोंदिवस जवसाची लागवड कमी होताना दिसत आहे. त्या तुलनेत करडईच्या लागवडीची स्थिती समाधानकारक आहे. सरासरी क्षेत्र २६,६५७ हेक्टर असून, आजपर्यंत २०,८२२ हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या ७८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

हेही वाचा : आता हलक्या मालवाहू वाहनांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने होणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दमदार पावसामुळे पेरण्याही दमदार

दमदार पावसाळ्यामुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता चांगली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे. उसाचा गळीत हंगाम उशिराने सुरू झाल्यामुळे ऊसतोडणी होईल, तशी लागवड क्षेत्रातही वाढ होईल. जानेवारीअखेरपर्यंत रब्बी पेरण्या होतील, अशी माहिती कृषी संचालक (विकास आणि विस्तार) रफीक नायकवडी यांनी दिली.