मुंबई : मुंबई महानगरात मंगळवारी रात्रीपासून पावसाची सुरुवात झाली होती. बुधवारी सकाळच्या सुमारास पावसाने जोर धरला. त्यामुळे लोकल सेवा धीम्यागतीने धावू लागली. तर, अनेक रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाले. काही ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साचण्याच्या घटना झाल्या. परिणामी, दिवसभर कल्याण-कर्जत-कसारा आणि काही अवधीसाठी पनवेल-बेलापूर रेल्वेसेवा विस्कळीत झाली. संपूर्ण दिवसभरात ५० अप आणि ५० डाऊन अशा  १०० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तसेच लांब पल्ल्याच्या मेल- एक्सप्रेस रेल्वे गाडय़ा पावसामुळे रद्द कराव्या लागल्या. यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल झाले.

हार्बर मार्गावरील पनवेल रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी सकाळी ९.४० च्या सुमारास पॉईंटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पनवेल – बेलापूर रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. परिणामी, पनवेलहून सीएसएमटीला येणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला. पॉईंटमध्ये बिघाड झाल्याचे समजताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि युद्धपातळीवर पॉईंटमधील बिघाड दुरुस्त केला. त्यानंतर पनवेल – बेलापूर सेवा सकाळी १०.०५ वाजता सुरू झाली. तसेच बेलापूर – सीएसएमटी लोकल सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही, असा दावा मध्य रेल्वेकडून करण्यात आला आहे.

अंबरनाथ-बदलापूर सेवा बंद..

मध्य रेल्वेवरील अंबरनाथ – बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने बुधवारी सकाळी ११.०५ च्या सुमारास लोकल सेवा बंद झाली. परिणामी, बदलापूर – सीएसएमटी लोकल सेवा रद्द करण्यात आली. सकाळच्या सुमारास कार्यालयाची वाट धरलेल्या नोकरदारांना पुन्हा घरची वाट धरावी लागली.

मुंबई महानगरात मुसळधार पाऊस पडत असून, सखल भागात पाणी साचले आहे. वाहतूक सेवेचे तीनतेरा वाजले. यातच मध्य रेल्वेच्या अंबरनाथ रेल्वे स्थानकात पाणी साचल्याने सीएसएमटी – बदलापूर लोकल सेवा बंद पडली. सीएसएमटी – अंबरनाथ लोकल सेवा आणि बदलापूर – कर्जत लोकल सेवा सुरू ठेवली.

कल्याण ते कसारा लोकल सेवा ठप्प

बुधवारी सकाळपासून कल्याण भागात जोरदार पाऊस पडत असल्याने, कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी दुपारी २.४० वाजता पॉईंटमध्ये तांत्रिक बिघाड झाला. या घटनेमुळे कल्याण ते कसारा दोन्ही दिशेकडील लोकल सेवा ठप्प झाली.

तिन्ही मार्गावर खोळंबा..

मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गात अनेक तांत्रिक बिघाड झाली. तसेच पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने तिन्ही मार्गावरील लोकल सेवा कूर्मगतीने धावत होती. पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशीराने धावत होती. तर मध्य रेल्वेवरील लोकल सेवा २० ते ३० मिनिटे आणि हार्बर मार्गावरील १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होती.

’ लोकल सेवा ठप्प झाल्याने एसटीच्या बस या रेल्वे स्थानकांच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूस उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना काहिसा दिलासा मिळाला. ही सेवा मोफत आहे, असे एसटी  प्रशासनाने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बेस्ट’च्या मार्गात बदल.. 

मुसळधार पावसामुळे शीव रोड क्रमांक २४ येथे पाणी साचले. त्यामुळे बस मार्ग क्रमांक २५, ७, ४११ च्या बस बुधवारी रात्री ९.१५  वाजल्यापासून रस्ता क्रमांक तीन मार्गे वळवण्यात आल्या, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली.