मुंबई : गेले अनेक दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी मुंबईत दमदार हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. गेल्या दोन – तीन दिवसांपासून काही ठिकाणी रिमझिम पाऊस हजेरी लावत होता. मात्र, मुंबईत फारसा पाऊस नसल्यामुळे उकाड्याने असह्य होत होते. दरम्यान, सोमवारी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला.
मुंबईत जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर नव्हता. अधूनमधून हलक्या सरी बरसल्या. दरम्यान, पावसाने ओढ दिल्यामुळे मागील काही दिवस मुंबईकरांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत होता. तसेच तापमानातही वाढ झाली होती. मुंबईत सोमवारी कोसळलेल्या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. याचबरोबर अनेक दिवसांनी पडलेल्या पावसामुळे मुंबईकर सुखावले. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी २८ अंश सेल्सिअस तर, सांताक्रूझ केंद्रात २७.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दोन्ही केंद्रावरील तापमान सरासरीपेक्षा २ अंशांनी कमी नोंदले गेले होते. मागील काही दिवस साधारण तापमानाचा पारा ३० अंशापुढे नोंदला जात होता.
दाखल झाला त्याचदिवशी मुसळधार
यंदा मोसमी पाऊस वेळेपूर्वीच मुंबईत दाखल झाला. पहिल्याच दिवशी पावसाने मुंबईकरांची दैना उडवली. गेल्या जवळपास ६९ वर्षांच्या नोंदींनुसार मुंबईत यंदा सर्वांत लवकर पाऊस दाखल झाला. दाखल झाला त्याचदिवशी मुंबईत मुसळधार पाऊस कोसळला. अनेक भागात पाणी साचले होते. वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबईत पाऊस पडलेला नाही. साधारण जुलै महिन्यात मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतो. मात्र, यंदा जुलै महिन्याचे काहीच दिवस शिल्लक आहेत. परंतु दरवर्षीप्रमाणे जुलै महिन्यात पडतो तसा पाऊस पडण्याची प्रतीक्षा कायम आहे.