मुंबई :अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला, चार बंगला, रतन नगर, या परिसरात गेल्या कित्येक महिन्यांपासून एकाचवेळी अनेक इमारतींच्या पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. रात्री अपरात्री, मध्यरात्री, पहाटे कधीही जोरजोरात आवाजात सुरू असलेल्या या कामांमुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. तसेच या परिसरात प्रचंड ध्वनिप्रदूषण, वायूप्रदूषण होत असून राडारोडा वाहून नेत असल्यामुळे परिसरातील रस्त्यावर पावसाळ्यात चिखल होऊ लागला आहे.

हिवाळा आला की मुंबईतील हवेचा स्तर बिघडतो आणि मग इमारत बांधकामांमुळे वायू प्रदूषण होत असल्याचा मुद्दा ऐरणीवर येतो. गेली दोन वर्षे बांधकामांमुळे वायू प्रदूषण होत असल्यामुळे मुंबई महापालिकेने या बांधकामांवर नियमावली लावली होती. मात्र हवेचा स्तर सुधारल्यानंतर ही नियमावली मागे पडली आहे. परंतु, मुंबईत सुरू असलेल्या या कामांमुळे नागरिकांना ध्वनिप्रदूषणाच्या त्रासालाही सामोरे जावे लागते आहे. तसेच एकाच परिसरात एकाचवेळी अनेक बांधकामांना परवानगी दिलेली असल्यामुळे त्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांचे जगणे नकोसे झाले आहे. अंधेरी परिसरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर पुनर्विकासाचे वारे वाहू लागले असून इमारतींचे पाडकाम, आणि खोदकाम याचा प्रचंड आवाज या परिसरात सतत येत असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वर्सोवा विधानसभेचे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. याबाबत देसाई यांनी सांगितले की, चार बंगला परिसरात रतन नगर येथे एकाचवेळी चार इमारतींची कामे सुरू आहेत. या परिसरात शाळा असून हा परिसर शांतता क्षेत्र आहे. तरीही रात्री अपरात्री, पहाटे, दुपारी कधीही प्रचंड मोठ्या आवाजात काम सुरू असते. त्यामुळे रहिवाशांना शांतपणे झोपता येत नाही. ज्येष्ठ नागरिकांना, लहान मुलांना या आवाजाचा प्रचंड त्रास होतो.

तसेच इमारतींचे पाडकाम करताना कोणतेही नियम न पाळता पाडकाम केले जाते. त्यामुळे या परिसरात प्रचंड वायू प्रदूषणही झाले आहे. तसेच विकास कामांसाठीची अवजड वाहने रस्त्याच्या आजूबाजूने लावलेली असल्यामुळे या मार्गावरून चालणेही अवघड झाले असल्याचे देसाई यांनी सांगितले. पोलिसांकडे तक्रार करून किंवा नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करूनही या आवाजावर कोणाचाच अंकुश नसल्याचा आरोप देसाई यांनी केला आहे. तसेच या कामासाठी वेळा ठरवून द्याव्यात व त्याचे पालन काटेकोरपणे करावे अशीही मागणी त्यांनी केली आहे.

अंधेरी लोखंडवाला रहिवासी संघटनेचे अध्यक्ष धवल शाह यांनी सांगितले की, मोठे क्षेत्रफळ मिळेल या आशेने या परिसराती इमारतीमधील रहिवासी मोठ्या संख्येने पुनर्विकास करून घेत आहेत. एकाचवेळी इतक्या इमारतींचा पुनर्विकास सुरू असल्यामुळे बाकीच्या रहिवाशांना मात्र त्रास होतो आहे. विकासकामांमुळे या परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धूळ माती साचली आहे. हे रस्ते टॅंकरने धुतले तरी रस्त्यांवरचा चिखल जात नाही व त्यावरून दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात मुंबईत हवेचा स्तर खालावला तेव्हा मुंबईतील एकूण बांधकामांचा आढावा मुंबई महापालिकेने घेतला होता. एकाचवेळी सुरू असलेल्या बांधकामांमुळे वायू प्रदूषण होत असल्याबाबत त्यावेळी सर्व स्तरातून चिंता व्यक्त केली जात होती. संपूर्ण मुंबईत एकाचवेळी सुमारे २२०० इमारत प्रकल्पांची कामे सुरू आहेत. मुंबई महापालिकेच्या २५ विभागांच्या हद्दीत सरासरी ५० ते ६० ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. त्यातही पश्चिम उपनगरात या बांधकामांचे प्रमाण जास्त आहे.