मुंबई : सध्या मुंबईसह संपूर्ण देशात उष्णतेच्या लाटेचा प्रकोप मोठ्या प्रमाणात जाणवत असून त्यामुळे आग लागण्याचा धोका वाढतो आहे. तापमान वाढून विजेच्या वाहिन्या (इलेक्ट्रिक वायरिंग) गरम होणे, शॉर्टसर्किट होणे, गॅस गळती होणे, पंखे, वातानुकूलित यंत्रणा, फ्रिज व इतर उपकरणांचा अतिवापर आणि त्यामुळे वीज वापरावरील ताण या साऱ्यांमुळे आगीच्या घटनांचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे या काळात नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाने केले आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून आग लागण्याच्या घटना वाढत आहेत. गेल्या पंधरा दिवसात तीन मोठ्या आगीच्या घटना घडल्या. दक्षिण मुंबईतील ईडीच्या कार्यालयाला आग लागली, त्यानंतर भायखळ्यात एका बेकरीला आग लागली. तर गेल्या आठवड्यात वांद्रे येथे आग दुर्घटनेत संपूर्ण मॉल भस्मसात झाला. तर सोमवारी पेडररोड येथे एका दुकानाला आग लागली. बहुतांशी आग प्रकरणात विद्युत यंत्रणेतील बिघाड (शॉर्ट सर्किट) हेच मुख्य कारण असते. या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमन दलाने मुंबईकरांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणती खबरदारी घ्यावी याबाबतही मार्गदर्शन केले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्याही सूचना
उष्णतेच्या लाटेमुळे सध्या एकूणच तापमानात लक्षणीय वाढ होत असून विजेच्या उपकरणांवर ताण येऊन परिणामी घर, कार्यालये व औद्योगिक परिसरात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारितील अग्निशमन सेवा, नागरिक सुरक्षा आणि गृहरक्षक महासंचालनालयाने (Directorate General FS, CD & HG, New Delhi) दिनांक १ मे रोजी याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार मुंबई अग्निशमन दलातर्फे नागरिकांना उष्णतेच्या लाटेमध्ये घ्यावयाच्या खबरदारीबद्दल आवाहन करण्यात आले आहे. मुंबईतील कोट्यवधी नागरिकांनी जर खबरदारी घेतली तर आग लागण्यासारख्या घटनांमध्ये लक्षणीय घट होऊ शकते, असे प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर यांनी म्हटले आहे.
मुंबई अग्निशमन दलाने केल्या या सूचना
१…. घरगुती व व्यावसायिक ठिकाणांवरील विद्युत वाहिन्या, प्लग, स्विच बोर्ड्स आणि उपकरणांची नियमित तपासणी करावी.
२. वापरानंतर पंखे, एसी, टीव्ही, मिक्सर, गीझर, इस्त्री इत्यादी उपकरणे त्वरित बंद करावीत.
३. जुन्या किंवा जीर्ण वायरिंगची तज्ज्ञांच्या मदतीने दुरुस्ती करावी.
४. आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी लागणारे सर्व मार्ग (जीने, प्रवेशद्वार) कायम मोकळे ठेवावेत.
५. एकाच प्लग सॉकेटमध्ये अनेक विद्युत उपकरणे लावणे टाळावे. ओव्हरलोडिंग टाळून योग्य प्रकारे विद्युत उपकरणे वापरावीत.
६. वातानुकूलित (AC) यंत्रणेची नियमित देखभाल (maintanace) करणे आवश्यक आहे.
७. घरात, दुकानात किंवा कार्यालयात किमान एक ‘फायर एक्सटिंग्विशर’ ठेवावा आणि त्याचा योग्य वापर शिकून घ्यावा.
८. रात्री झोपताना मोबाईल चार्जिंग किंवा अन्य उपकरणे चालू ठेवणे टाळावे.
९. रुग्णालये, नर्सिंग होम, क्लिनिक्स यांनी आवश्यक ती अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित ठेवून वेळेवर अग्निसुरक्षेचा आढावा घ्यावा १०. कोणतीही आग लागल्यास वेळ न दवडता १०१ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा.