मुंबई : ठाण्यातील माजिवडे येथील वर्तकनगर पोलीस वसाहतीचा पुनर्विकास प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्यामुळे रखडला आहे. हा प्रकल्प व्यवहार्य ठरावा आणि तो मार्गी लागावा म्हणून म्हाडा प्राधिकरणाने आपल्या हिश्शातील भूखंडावर अतिरिक्त घरे बांधण्याऐवजी उपलब्ध भूखंडाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोकण मंडळाने दोन भूखंडांच्या ई लिलावासाठी निविदा मागविली आहे.

या पुनर्विकासासाठी ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून भूखंडाच्या विक्रीसाठी ४५० कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे. एकूणच किमान प्रकल्प खर्च वसूल करण्याचा कोकण मंडळाचा प्रयत्न आहे. परिणामी, ठाण्यातील माजिवडे येथील वर्तकनगर पोलीस वसाहतीचा रखडलेला पुनर्विकास मार्गी लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – मुंबई विमानतळावरून दोन कोटींचे सोने जप्त

वर्तकनगर येथील म्हाडा अभिन्यासात कोकण मंडळाने १९७३ मध्ये पोलीस वसाहत बांधली. या वसाहतीमधील घरे पोलिसांना निवासस्थान म्हणून देण्यात आली होती. आता या वसाहतीतील इमारती जर्जर झाल्या असून पुनर्विकासाची मागणी झाल्यानंतर इमारती रिकाम्या करून त्या पाडण्यात आल्या. दरम्यान, प्रकल्प व्यवहार्य ठरवा यासाठी कोकण मंडळाला उपलब्ध होणाऱ्या हिश्शातील भूखंडावर घरे बांधण्याऐवजी भूखंडाचा ई लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – राजकीय फूट प्रचार साहित्य निर्मात्यांच्या पथ्यावर, मागणीत वाढ झाल्याने कारागिरांची रात्रंदिवस मेहनत

पोलिसांसाठी ५३८ चौरस फुटांचे घर

कोकण मंडळाकडून मार्चमध्येच पुनर्विकासासाठी बांधकामविषयक निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रकल्पात पोलिसांसाठी ५३८ चौरस फुटांची ३८० घरे बांधण्यात येणार आहेत. चार दुकाने आणि येथील २०० झोपड्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. तसेच एक पोलीस ठाणेही बांधून देण्यात येणार आहे. जूनमध्ये निविदा अंतिम करून जुलै-ऑगस्टमध्ये पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे कोकण मंडळाचे नियोजन आहे.