मुंबई : मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून गुरुवारी पहाटे ५.३० च्या सुमारास समृद्धी महामार्गावर अमरावती, तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघात झाला. खासगी बसला कंटेनरची धडक लागली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. खासगी बस चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचे समजते. अपघातानंतर चालक पळून गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

ऋषी गौड (२०) रा. लितीपूर ता. नवागड, छत्तीसगड, डगेश्वर गौड (२२) रा. पदमी, छत्तीसगड व प्रकाश (बसमधील मदतनीस) यांचा समावेश आहे. त्‍यांचे मृतदेह धामणगाव रेल्‍वे येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करीता पाठविण्यात आले आहे. महेंद्र ट्रॅव्‍हल्स कंपनीची सीजी १९/ एफ ०३८१ क्रमांकाची ही प्रवासी बस अहमदनगरहून रायपूरकडे जात होती. गुरूवारी पहाटे पाच वाजताच्‍या सुमारास वाढोणा ते शिवणी दरम्‍यान या भरधाव बसने कंटेनरला पाठीमागून धडक दिली. अपघातात तिघांचा घटनास्‍थळीच मृत्‍यू झाला.

हेही वाचा – म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीसाठी मुख्यमंत्र्यांना वेळ मिळेना

हेही वाचा – मराठा आंदोलन आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त, मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

महेंद्र ट्रॅव्हल्सची खासगी बस अहमदनगर येथून रायपूरला समृद्धी महामार्गाने जात होती. अमरावती येथील तळेगाव दशासर येथे पहाटे ५.३० च्या सुमारास ही खासगी बस एका कंटेनरवर धडकली. चॅनेल १२८ येथे हा अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाहनचालक पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान खासगी बसच्या चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीत सामोरे आले आहे. पण या अपघाताने समृद्धी मागमार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समृद्धी महामार्गावर आतापर्यंत झालेले अपघात हे रात्री व पहाटेच्या दरम्यान झालेले आहेत. अनेकदा या वेळेत चालकाला डुलकी लागते. त्यात ठरवून दिलेल्या मर्यादापेक्षा वाहनांचा वेग असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे होणारे अपघात हे अत्यंत भीषण असतात. समृद्धी महामार्गावर एवढ्या वेगाने जी वाहने चालवली जातात ती देखील या वेगासाठी योग्य नसतात, असेही स्पष्ट झाले आहे.