मुंबई : निधी वाटपावरून महाविकास आघाडीत सुरू असणारी धुसफुस आता उघड झाली असून त्यावरून आपली नाराजी व्यक्त करणारे पत्र शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यात गैर काहीच नाही असे स्पष्ट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सेनेची नाराजी दूर करण्याची गरज असल्याचे संकेत राष्ट्रवादीला दिले आहेत. निधी वाटपात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदार संघांना झुकते माप दिले जाते अशी व्यथा शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे व्यक्त केली. त्यास राऊतांनी एक प्रकारे दुजोरा दिला. निधी वाटपाबाबत असलेल्या असंतोषाबद्दलच्या पत्रावरती चर्चा झाली आहे. शिवसेनेच्या २५ किंवा त्यापेक्षा जास्त आमदारांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या असतील तर त्यात गैर काहीच नाही. पक्ष कोणताही असला तरी राज्य सरकारच्या निधीवर प्रत्येक निवडून आलेल्या आमदाराचा तेवढाच हक्क आणि अधिकार आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. या नाराज आमदारांशी संवाद साधण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे व सुभाष देसाई यांच्यावर टाकण्यात आल्याचे सांगितले जाते.