मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फेसबुकवरील बदनामीकार मजकूर आणि छायाचित्रांना लाइक करून त्यावर भावना भडकविणारी प्रतिक्रिया देणाऱ्या नेटीझनवरही कारवाई करण्यात येणार आहे. तपास यंत्रणाना तशा सूचना देण्यात आल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली. बदनामी करणारी छायाचित्रे अमेरिकेतून अपलोड करण्यात आली असून संगणकाचा आयपी अ‍ॅड्रेस पोलिसांनी शोधून काढला आहे. समाजात तेढ निर्माण करणारी छात्राचित्रे अमेरिकेतून फेसबुकवर टाकण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याशीही चर्चा झाली असून चौकशीसाठी केंद्राने एक पथक गठीत केले आहे. शिवाय राज्यातही एक पथक तयार करण्यात आले आहे. ही दोन्ही पथके एकमेकांशी समन्वय साधून तपास करीत असून ज्यांनी फेसबुकवरून या छायाचित्रांना लाइक करून प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्यांचा आयपी अ‍ॅड्रेसच्या माध्यमातून शोध घेऊन कारवाई करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

हार्बर मार्गावर रेल रोको
हार्बर मार्गावरील चेंबूर आणि गोवंडी या स्थानकांदरम्यान रेल्वेरूळ ओलांडताना एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर येथील स्थानिकांनी केलेल्या रेल्वे रोकोमुळे या मार्गावरील वाहतूक तब्बल अर्धा तास रखडली. मध्य रेल्वेच्या म्हणण्यानुसार या रेल्वे रोकोचा फटका फक्त तीनच उपनगरीय  गाडय़ांना बसला. मात्र, प्रवाशांच्या मते किमान बारा सेवा रखडल्या आणि हार्बर मार्गावरील वाहतूक अर्धा तास उशिराने धावू लागली. सोमवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलने चेंबूर आणि गोवंडी स्थानकांदरम्यान रेल्वेरूळ ओलांडणाऱ्या शंकर राठोड (२०) या तरुणाला धडक दिली. या धडकेत शंकरचा जागीच मृत्यू झाला. ही गाडी गेल्यानंतर येथील नागरिकांनी मृतदेह त्वरीत उचलला जावा, यासाठी रुळांवर उतरत आंदोलन केले. त्यामुळे या गाडीमागून येणाऱ्या तीन गाडय़ा एकामागे एक थांबल्या होत्या. अखेर रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संतप्त नागरिकांची समजूत काढली. तब्बल २५ मिनिटे चाललेले हे आंदोलन ३.१०च्या सुमारास संपले. मात्र, या आंदोलनाचा परिणाम संध्याकाळी उशिरापर्यंत हार्बर मार्गावरील सेवांवर झाला.

दरडी कोसळण्याचा इशारा
मुंबई : गोवंडी, देवनार पट्ट्यात डोंगर उतारावर बांधलेल्या झोपडय़ांना दरडी तसेच नाल्याच्या पुराचा धोका असल्याची नोटीस पालिकेने काढली आहे. या परिसरातील झोपडय़ा तातडीने रिकाम्या कराव्यात, दरडी किंवा पुलामुळे होणाऱ्या जीवित व वित्त हानीस पालिका जबाबदारी राहणार नसल्याचेही कळवण्यात आले आहे.
गौतम नगर, पांजरपोळ, ओम गणेश नगर, राहुल नगर, नागाबाबा नगर, सह्याद्री नगर, अशोक नगर, भारत नगर, बंजारतांडा, हशू अडवाणी नगर व विष्णू नगर येथील डोंगर उतारावर शेकडो झोपडय़ा आहेत. या ठिकाणी दरडी कोसळण्याची भीती आहेत. तसेच डोंगर उतारावरून वेगाने येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे नाल्याला पूर येण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे येथे राहत असलेल्या नागरिकांनी स्वतहून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले. स्थलांतर न करणाऱ्यांनी तेथे स्वतच्या जबाबदारीवर राहावे, नसíगक आपत्तीने कोणतीही दुर्घटना घडल्यास, जीवित व वित्त हानी झाल्यास पालिका जबाबदार राहणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दलित अत्याचार वाढल्याची  मुख्यमंत्र्यांची कबुली
मुंबई : राज्यात गेल्या तीन महिन्यांत दलितांवरील अत्याचारात वाढ झाली आहे, अशी कबुली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासमवेत झालेल्या बैठकीत दिली. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात लवकरच आपल्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीची बैठक घेऊन दलितांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
राज्यात दलित अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, त्याचा निषेध करण्यासाठी रिपाइंतर्फे सोमवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला होता. त्याचवेळी रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची विधान भवनात भेट घेतली.