मुंबई : अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला कर्जमाफी आणि प्रती हेक्टरी ५० हजारांची मदत मिळालीच पाहिजे या मागणीसाठी शिवसेना (ठाकरे) आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात दिला होता. त्यानुसार मेळाव्याच्या दुसऱ्याच दिवशी ठाकरे गटाकडून या आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी ५ ते ११ ऑक्टोबर दरम्यान मराठवाड्यात आंदोलन केले जाणार असून विभागीय आयुक्त, तहसीलदार कार्यालयांवर हंबरडा मोर्चा काढण्यात येणार आहे.

सर्वांना अन्नाचा घास देणारा महाराष्ट्रातला शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाला आहे. त्याची शेती आणि संसार पाण्यात वाहून गेला. पाणावलेल्या डोळ्यांनी बेंबीच्या देठापासून ओरडून तो मायबाप सरकारकडे मदत मागतोय. पण निर्दयी महायुती सरकार त्याचे आर्जव ऐकण्यास तयार नाही. त्यामुळे शिवसेना शेतकऱ्यांसाठी धावून गेली आहे.

शेतकऱ्यांचा आवाज बहिऱ्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना हंबरडा फोडणार आहे. शेतकऱ्यांनी तातडीने आर्थिक मदत आणि कर्जमुक्ती मिळावी या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ११ ऑक्टोबरला मराठवाड्यात विराट हंबरडा मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती शिवसेना (ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी प्रसिद्धीपत्रकाराद्वारे दिली आहे.

या आहेत मागण्या

अतिवृष्टीमुळे त्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांना त्वरित थेट आर्थिक मदत मिळावी, संपूर्ण कर्जमुक्ती दिली जावी, पंजाब सरकारच्या धर्तीवर हेक्टरी ५० हजार रुपये देण्यात यावेत. पीकविम्याचे नवीन निकष रद्द करून पूर्वीचेच निकष कायम ठेवावेत. घरे आणि पशुधन नुकसानभरपाई तातडीने देण्यात यावी, अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात येणार आहे.

५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत मराठवाड्यात होणाऱ्या या आंदोलनात. ५ ते ७ ऑक्टोबर ग्रामसभा, गावभेटी आणि गाव बैठका घेतल्या जातील, ८ ऑक्टोबर रोजी प्रत्येक तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे व निदर्शने केली जातील. ११ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर हंबरडा मोर्चा काढण्यात येणार आहे.