मुंबई: गेली अनेक वर्षे धोकादायक स्थितीत उभी असलेली चुनाभट्टीमधील टाटानगर इमारत अखेर मुंबई महानगरपालिकेने जमीनदोस्त केली. मात्र या इमारतीत वास्तव्यास असलेले गिरणी कामगार आद्यपही वाऱ्यावरच आहेत. दरम्यान, सरकारने पर्यायी निवाऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

चुनाभट्टीमधील स्वदेशी गिरणीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी १९६० मध्ये चुनाभट्टी परिसरात टाटानगर इमारत बांधण्यात आली होती. काही वर्षांपूर्वी ही गिरणी बंद झाली. त्यानंतर कंपनीने या इमारतीकडे कानाडोळा केला. परिणामी, डागडुजीअभावी इमारतीची अवस्था दयनीय झाली. इमारतीच्या छताला दिलेला सिमेंटचा गिलावा अधूनमधून कोसळत असल्याने रहिवासी जीव मुठीत धरून इमारतीमध्ये राहत होते. मात्र गेल्या तीन – चार वर्षांत इमारत जरजर झाली. त्यामुळे काही रहिवाशांनी पदरमोड करून भाड्याच्या घरात राहणे पसंत केले.

हेही वाचा… आता सेंट जॉर्ज रुग्णालयातही यकृत प्रत्यारोपण शक्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या दोन वर्षापर्यंत या इमारतीत सहा ते सात कुटुंबे वास्तव्यास होती. मात्र दीड वर्षांपूर्वी कुर्ला येथील नेहरूनगर परिसरातील एक धोकादायक इमारत कोसळल्यानंतर भर पावसात महानगरपालिकेने टाटानगर इमारत पूर्णपणे रिकामी केली. त्यानंतर काही दिवस या कुटुंबियांना महानगरपालिकेने एका शाळेत आश्रय दिला होता. मात्र काही दिवसानंतर हे नागरिक पुन्हा या इमारतीत वास्तवास आले होते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी महानगरपालिकेने पुन्हा या सर्वांची घरे रिकामी करून इमारत तोडण्यास सुरुवात केली. या इमारतीमधील बहुसंख्य रहिवासी सध्या भाड्याच्या घरात अथवा नातेवाईकांकडे वास्तव्यास आहेत. दरम्यान, सरकारने आम्हाला याच परिसरात कायमस्वरूपी घर द्यावे किंवा भाडे द्यावे, अशी मागणी या गिरणी कामगारांकडून करण्यात येत आहे.