मुंबई : घरफोडीचा आरोप असलेल्या संशयिताच्या २००९ मध्ये झालेल्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी विशेष न्यायालयाने मंगळवारी दोन माजी पोलिसांना दोषी ठरविले. तसेच, त्यांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. त्याचवेळी, या पोलिसांची खुनाच्या आरोपातून मात्र न्यायालयाने निर्दोष सुटका केली.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या गुन्ह्यांशी संबंधित खटल्याचे कामकाज पाहणाऱ्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. व्ही. गुजराती यांनी हा निर्णय दिला. विशेष न्यायालयाने घाटकोपर पोलिस ठाण्याचे तत्कालीन उपनिरीक्षक संजय खेडेकर आणि पोलीस हवालदार रघुनाथ कोळेकर यांना संशयितांना गंभीर दुखापत करणे आणि बेकायदेशीररीत्या बंदिवासात ठेवणे या आरोपांतर्गत दोषी ठरवून सात वर्षांची शिक्षा सुनावली.
खेडेकर आणि कोळेकर हे सध्या जामिनावर आहेत. त्यामुळे, त्यांना निर्णयाला आव्हान देता यावे यासाठी विशेष न्यायालयाने त्यांच्या शिक्षेचा निर्णय ७ नोव्हेंबरपर्यंत स्थगित केला. या प्रकरणातील तिसरा आरोपी असलेला पोलीस कर्मचारी सयाजी ठोंबरे यांचा खटला सुरू असतानाच मृत्यू झाल्याने त्यांच्याविरोधातील खटला रद्द करण्यात आला.
प्रकरण काय ?
घरफोडीच्या प्रकरणात पोलिसांनी संशयित म्हणून अल्ताफ शेख याला ताब्यात घेतले. त्यानंतर, ११ सप्टेंबर २००९ रोजी घाटकोपर पोलीस ठाण्यात अल्ताफ शेख याचा संशयितरित्या मृत्यू झाला. शेख याच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेऊन पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा केला. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले होते.