मुंबई : गोराई येथील कचराभूमीच्या तब्बल ५० एकर जागेवरच लवकरच मोठे पर्यटन केंद्र उभारण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी याबाबत महापालिका मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत घोषणा केली होती. गोराई कचराभूमी बंद होऊन १८ वर्षे झाली असून आता ही जमीन पुनर्वापर योग्य झाली आहे. त्यामुळे या जमिनीवर पर्यटनवाढीसाठी कोणता प्रकल्प हाती घ्यावा याबाबत पालिका प्रशासन विचारविनिमय करीत आहे.

गोराई येथे पालिकेची कचराभूमी होती. ही कचराभूमी २००७ मध्ये बंद झाली. येथील कचऱ्याची विल्हेवाट लावून जमीन मोकळी झाली आहे. त्यानंतर जमिनीत साठलेला मिथेन वायू देखील बाहेर काढण्यात आला आहे. तसेच गेल्या १८ वर्षांत पावसाचे पाणी झिरपून ही जमीन आता पुनर्वापर योग्य झाली आहे. गोराई येथील कचराभूमीची ही जागा तब्बल २० हेक्टर म्हणजेच ५० एकर इतकी आहे. या जागेवर सध्या केवळ हिरवळ आहे. या जागेवर मुंबईकरांसाठी एखादे पर्यटन स्थळ उभारण्यात येईल, अशी घोषणा उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी नुकतीच केली होती. उत्तर मुंबईतील विविध विकासकामांची आढावा बैठक त्यांनी काही दिवसांपूर्वी पालिका मुख्यालयात घेतली होती. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली होती.

हेही वाचा >>>नाशिकजवळ ‘महाकुंभ’ची निर्मिती करा मुख्यमंत्री; संमेलन केंद्र उभारण्याच्याही अधिकाऱ्यांना सूचना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोराई कचराभूमी येथे कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा पालिका प्रशासनाचा आधी प्रयत्न होता. मात्र त्याला येथील नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे हा प्रकल्प येथे होणार नाही, असे गोयल यांनी स्पष्ट केले. या जागी आता पर्यटनस्थळ तयार करण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासनाचे प्रयत्न आहेत. या ठिकाणी पर्यावरण पूरक असे उद्यान, प्राणी संग्रहालय, थीम पार्क यापैकी काही तरी करण्याचा विचार सुरू असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.