मुंबई : अवकाळी पावसामुळे सुक्या मासळीचा व्यवसाय करणाऱ्या हजारो कोळी महिलांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. परिणामी, ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून मच्छिमारांकडून करण्यात येत आहे. मात्र, त्यावर शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची खंत मच्छीमारांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कोळी महिलांना उदरनिर्वाह करण्यासाठी पीक-विमा योजनेतून अर्थसहाय्य देण्याची मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने मत्स्यव्यवसाय विभागाकडे केली आहे.

सुक्या मासळीचा व्यवसाय करणाऱ्या कोळी महिला बाजार किंवा बंदरावरून मासळी विकत घेऊन गावात ती सुकविण्याचे काम करतात. उन्हात ही मासळी सुकवून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, अवकाळी पावसामुळे सुकी मासळीचे नुकसान होत असून कोळी उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नाड डिमेलो यांनी सांगितले. शेतकऱ्यांप्रमाणेच कोळी सुकी मासळी व्यावसायिकांची पिक-विमा योजनेअंतर्गत नोंदणी करून त्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री आणि सचिवांना निवेदन पाठवले आहे. योजनेचा लाभ क्रियाशील व्यावसायिकांना मिळावा, तसेच सवलतीचा गैरवापर टाळण्यासाठी उपाययोजना करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, क्रियाशील सुकी मासळी व्यावसायिकांकडून नाममात्र शुल्क घेऊन त्यांची ‘सुकी मासळी उत्पादक’ म्हणून शासकीय नोंद करावी, तसेच सुकी मासळी व्यावसायिकांची आकडेवारी व उत्पन्नाची शासकीय नोंदी नसल्याने संबंधितांचे लेखापरीक्षण करावे, शेतकऱ्यांप्रमाणेच सुकी मासळी उत्पादकांनाही पीक-विमा योजनेची सवलत द्यावी, अशा मागण्या अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने मत्स्यव्यवसाय विभागाकडे केल्या आहेत.