मुंबई : मुंब्रा येथे झालेल्या लोकल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर वंचितच्या मुंबई प्रदेशाच्या पदाधिकाऱ्यांनी सीएसएमटी येथील मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) कार्यालयात मंगळवारी डीआरएम अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या, रेल्वे प्रवाशांना दररोज भेडसावणाऱ्या समस्येला वंचित बहुजन आघाडीने वाचा फोडली.

मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करावी, दुर्घटनेतील मृत्युमुखी आणि जखमींना योग्य आर्थिक मोबदला द्यावा, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करावी आणि यापूर्वी झालेल्या तसेच मुंब्रा येथील दुर्घटनेची सर्व जबाबदारी मध्य रेल्वे प्रशासनाने घ्यावी, अशा विविध मागण्या यावेळी पदाधिकाऱ्यांनी केल्या. मुंब्रा येथील घटनेची तपासणी, दुर्घटनाग्रस्त प्रवाशांची चौकशी करण्याऐवजी काही तासांच्या कालावधीत सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने तडकाफडकी घेतला. त्याबाबत माध्यमावर मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी घोषणा केली. तर, दुसरीकडे मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) हिरेन मीना चिडीचूप होते, असा आरोप वंचितने केला आहे.

डीआरएम मुंबईच्या ‘एक्स’वरील खात्यावर अपघाताबाबत कुठलीही पोस्ट करण्यात आलेली नाही. मृत प्रवाशांना श्रद्धांजली वाहण्याची संवेदनशीलता दाखवण्यात आली नाही. त्याऐवजी ‘एक्स’वर मोदी सरकारच्या इतर योजनांची ठळकपणे जाहिरातबाजी केल्याचे निदर्शनास आले. सोमवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास डीआरएम मुंबईच्या ‘एक्स’ खात्याला जाग आली. त्यानंतर त्यांनी प्रवाशांना दुर्घटनेची माहिती देण्यास सुरुवात केली. याबाबात वंचित बहुजन आघाडीने संताप व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्याच्या निर्णयाचा वंचितने निषेध केला आहे. गर्दीच्या वेळी हे दरवाजे प्रवाशांसाठी जीवघेणे ठरू शकतात, अशी शक्यता वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेशाच्या पदाधिकाऱ्यांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. या शिष्टमंडळात मुंबई प्रदेश अध्यक्ष चेतन अहिरे, महिला आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष स्नेहल सोहनी, मुंबई प्रदेश महासचिव विश्वास सरदार, सतीश राजगुरू यांचा समावेश होता.