मुंबई : आपले चित्रपट चालत का नाहीत, या विषयावर हल्ली सर्वाधिक खल होत असतो याकडे लक्ष वेधत मुळात तुमचे सध्याचे व्यवसायाचे गणितच चुकलेले आहे. त्यात ‘ओटीटी’मुळे चित्रपटगृहांमधून होणाऱ्या व्यवसायाला फटका बसला आहे, असे मत अभिनेता आमिर खान याने व्यक्त केले.

जागतिक दृक्श्राव्य आणि मनोरंजन अर्थात ‘वेव्हज’ परिषदेच्या पहिल्या दिवशी अभिनेता शाहरुख खान याने देशभरात विविध पद्धतीची चित्रपटगृहे वाढवण्याची गरज व्यक्त केली होती. तोच धागा पकडत अभिनेता आमिर खान याने ‘स्टुडिओज ऑफ द फ्युचर : पुटिंग इंडिया ऑन वर्ल्ड स्टुडिओ मॅप’ परिसंवादात चित्रपट व्यवसायातील परिस्थितीवर भाष्य केले.

‘पूर्वी एखादा मोठा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो वर्षभराने दूरचित्रवाहिन्यांवर प्रसारित केला जायचा. त्यामुळे एकतर चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघा किंवा वर्षभर प्रतीक्षा करा, हा एकच पर्याय प्रेक्षकांसमोर होता. नंतर हे गणित आठ महिन्यांवर, मग सहा महिन्यांवर आले, पण आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत ओटीटीवर येतो, असेही आमिर खान याने नमूद केले. चर्चासत्रात निर्माते दिनेश विजन, रितेश सिधवानी, ‘पीव्हीआर आयनॉक्स’चे अजय बिजली, अमेरिकन निर्माता चार्ल्स रोवेन, ‘डीएनईजी’ व्हीएफएक्स कंपनीचे नमित मल्होत्रा सहभागी होते.

हिंदी चित्रपटांची केवळ ५ हजार चित्रपटगृहे

● ‘भारताची लोकसंख्या पाहता आपल्याकडे असलेली चित्रपटगृहांची संख्या किरकोळ आहे. भारतापेक्षा एक तृतियांश लोकसंख्या असलेल्या अमेरिकेत ४० हजार चित्रपटगृहे आहेत. त्या तुलनेत आपल्याकडे फक्त १० हजार चित्रपटगृहे आहेत.

● १० हजार चित्रपटगृहांपैकी निम्मी दक्षिणेत आणि उर्वरित चित्रपटगृहे संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी विखुरलेली आहेत. म्हणजे केवळ हिंदी चित्रपटांच्या व्यवसायाचा विचार करायला झाला तर त्यांना ५ हजारच चित्रपटगृहे उपलब्ध आहेत’, अशा शब्दांत आमिरने वास्तवाकडे लक्ष वेधले. गेल्या दशभराहून अधिक काळ आपण फक्त चित्रपटगृहांच्या समस्येशीच झगडतो आहोत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशातील अगदी छोट्या-छोट्या शहरांमधून स्वस्त तिकीटदरात चित्रपट पाहता येईल, अशा पद्धतीची चित्रपटगृहे उभारणे ही आजच्या काळाची गरज आहे. – आमिर खान, अभिनेता