लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींच्या नावाचे गोडवे गाणाऱ्या राज ठाकरेंच्या सध्याच्या भूमिकेबाबत मोदी भक्त काय बोलणार, असा सवाल काँग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी उपस्थित केला आहे. काही दिवसांपूर्वी राज यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टीकेचे लक्ष्य करत नालायक भाजप सरकारपेक्षा काँग्रेस परवडली, अशी टीका केली होती. या पार्श्वभूमीवर दिग्विजयसिंह यांनी मोदी भक्तांनो राज ठाकरेंबाबत काय म्हणणे आहे?, असा सवाल विचारत ट्विटरवर एक पोस्टर शेअर केले आहे. आज मोदींचे मित्र म्हणत आहेत की भाजपपेक्षा काँग्रेस चांगले होते. उद्या संपूर्ण देश पुन्हा एकदा म्हणेल काँग्रेसपेक्षा चांगले कोणतेही सरकार नाही, अशा आशयाचा मजकूर या पोस्टरवर लिहला आहे.
नालायक भाजपपेक्षा काँग्रेसवाले परवडले- राज ठाकरे 
२०१३ मध्ये वेगळ्या विदर्भाची जनमत चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी वेगळ्या विदर्भाच्या बाजूने देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट केलेली छायाचित्रे राज यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांसमोर पुराव्यासह सादर करत विदर्भ राज्यासाठी मतदान करणाऱ्या अशा मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून राहण्याचा अधिकार आहे का?, असा प्रश्‍न उपस्थित केला होता. तसेच महाराष्ट्र दिनी मुंबईतील हुतात्मा चौकाची सजावट केली नसल्याचेही निदर्शनास आणून देत भाजप सरकारपेक्षा काँग्रेसचे सरकार चांगले होते, असे वक्तव्य केले होते.
महाराष्ट्राची प्रतिकृती असलेला केक कापल्याबद्दल श्रीहरी अणेंची दिलगिरी