परीक्षेच्या कामावरील बहिष्कार निष्प्रभ ठरल्यानंतर आता आपण केलेल्या अंतर्गत मूल्यांकनाचे गुण विद्यापीठाकडे सुपूर्द करणार नाही, असा पावित्रा संपकरी प्राध्यापकांनी घेतला आहे. याचा परिणाम मुंबई विद्यापीठाच्या टीवायबीकॉम तसेच महाविद्यालयीन स्तरावर घेण्यात आलेल्या श्रेयांक श्रेणी (क्रेडिट) विषयांच्या निकालावर होण्याची शक्यता आहे.
टीवायबीकॉमच्या ४० टक्के गुणांचे अंतर्गत मूल्यांकन त्या त्या विषयाच्या प्राध्यापकांनी महाविद्यालयीन स्तरावर केले आहे. त्यामुळे, आजच्या घडीला या गुणांचा तपशील केवळ प्राध्यापकांकडेच आहे. त्यांनी ते आपापल्या महाविद्यालयातही सुपूर्द केलेले नाहीत.
६० टक्के गुणांच्या विद्यापीठ स्तरावर झालेल्या परीक्षेत हे अंतर्गत मूल्यांकनासाठीचे ४० टक्के गुण समाविष्ट करून अंतिम निकाल विद्यापीठाला जाहीर करायचा आहे. पण, प्राध्यापकांनी हे गुण विद्यापीठाकडे सुपूर्दच केले नाही तर विद्यापीठाला उत्तरपत्रिका मूल्यांकनाचे काम पूर्ण करूनही टीवायबीकॉमचा निकाल जाहीर करता येणे शक्य नाही.
वेतन थकबाकी आणि सेट-नेटबाधित शिक्षकांना नियुक्तीच्या तारखेपासून कायम करण्याच्या मागण्यांसाठी गेले ६४ दिवस राज्यभरातील प्राध्यापकांनी परीक्षेच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. बहिष्कार असूनही मुंबई, एसएनडीटी, जळगाव, पुणे आदी राज्यातील विद्यापीठांनी कंत्राटी, तात्पुरत्या शिक्षक आणि शिक्षकेतर तसेच बँक व अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने लेखी परीक्षा सुरू केल्या आहेत. पण, आता विद्यापीठासमोरील आव्हान उत्तरपत्रिका तपासणीचे असून वेळेत निकाल जाहीर करण्याचे आहे.
‘एमफुक्टो’ या प्राध्यापकांच्या राज्यस्तरीय संघटनेच्या महासचिव तृप्ती मुखोपाध्याय यांनी पत्रकार परिषदेत आपल्या आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.  मुल्यांकनावरील बहिष्कार गेल्या वर्षीप्रमाणे निष्प्रभ ठरणार अशी चर्चा आहे. त्या संबंधात मुखोपाध्याय यांना छेडले असता त्यांनी विद्यापीठांनी उत्तरपत्रिका तपासणीचे काम थांबविले नाही तरी आम्ही आमचे अंतर्गत मूल्यांकनाचे गुण विद्यापीठाकडे सुपूर्द करणार नाही, असा पावित्रा घेतला.
अर्थात याचा फटका केवळ मुंबईसारख्या विद्यापीठांना बसण्याची शक्यता आहे. कारण, या वर्षी केवळ वाणिज्य शाखेलाच अंतर्गत मूल्यांकन लागू आहे. शिक्षकांच्या बहिष्काराला न जुमानता परीक्षांचा दर्जा खालावून निकाल जाहीर करण्याच्या विद्यापीठ प्रशासनाच्या या अट्टहासाचा आम्ही निषेध करतो, असे एमफुक्टोचे डॉ. सदाशिवन यांनी स्पष्ट केले.
सरकारने आमच्याची चर्चा करावी
आमच्या संपाबाबत सरकार सुचवित असलेल्या तोडग्यांबाबत आम्हाला वृत्तपत्रांतूनच समजते. आमच्याशी याबाबत चर्चा केली जात नाही. त्यामुळे, सरकारच्या आश्वासनांवर विसंबून आम्ही बहिष्कार मागे घेणार नाही, असे मुखोपाध्याय यांनी स्पष्ट केले. सरकारशी समोरासमोर बोलणी झाल्यानंतरच आम्ही याबाबत आमची भूमिका स्पष्ट करू, असे त्यांनी सांगितले.