नागपूर : मलजल स्वच्छ (सेप्टिक टॅन्क) स्वच्छ करण्यासाठी यंत्राचा वापर बंधनकारक असतानाही मागील पाच वर्षांत हे काम करताना देशात ३३० कामगारांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील ही संख्या ३० आहे. विशेष म्हणजे, मृत कामगारांच्या कुटुंबीयांच्या मदतीतही दिरंगाई होत असून एकूण मृत कामगारांपैकी २८३ कुटुंबांनाच आर्थिक मदत मिळाली आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, यंत्राद्वारे मलजल स्वच्छ करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग व केंद्रीय गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कार्य योजना (इकोसिस्टीम) केंद्र सरकारने सुरू केली. स्वच्छतेच्या कामात अपघात टाळणे हाच या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या कामासाठी मानक कार्यपद्धतीही निश्चित करण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही ग्रामीण भागात किंवा छोटय़ा शहरांमध्ये त्याचे पालन होत नाही. कामगारांच्या माध्यमातूनच मलजल स्वच्छतेचे काम केले जाते. त्यामुळे दुर्घटना घडतात. केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या आकडेवारीनुसार, २०१७ ते २०२१ या दरम्यान देशात एकूण ३३० कामगारांचा मृत्यू झाला. त्यात महाराष्ट्रातील ३० जणांचा समावेश आहे. अशाप्रकारच्या घटना टाळण्यासाठी यंत्राचा वापर वाढल्याने २०१७ ते २०१८ या दोन वर्षांत या घटनांची संख्या ९२ वरून ८१ पर्यंत कमी झाली. पण, २०१९ मध्ये त्यात वाढ होऊन ती ११६ झाली. यात उत्तर प्रदेश (२६ मृत्यू) नंतर महाराष्ट्राचा (१५) क्रमांक होता. पण, २०२० व २०२१ मध्ये यात पुन्हा लक्षणीय घट झाली. महाराष्ट्रात २०२१ मध्ये अशाप्रकारच्या घटनेची नोंद, नाही हे येथे उल्लेखनीय.

दरम्यान, कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना दहा लाखाची आर्थिक मदत केली जाते. मात्र ती मिळण्यासही दिरंगाई होत आहे. देशात मृत ३३० पैकी २८४ तर राज्यात ३० पैकी ११ कामगारांच्या कुटुंबीयांना मदत मिळू शकली.

देशातील स्थिती

वर्ष     देश    राज्य

२०१७   ९२     ५

२०१८   ६७    ६

२०११   १६     १५

२०२०   १९     ४

२०२१   ३६     ०