लोकसत्ता टीम
चंद्रपूर: महाऔष्णिक वीज केंद्रातील ५०० मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक ५ च्या जनरेटरमध्ये बिघाड आल्यामुळे हा संच मे महिन्यापासून बंद आहे. साडेतीन महिन्या पासून बंद असलेल्या संच व जनरेटरमधील बिघाड दुरुस्ती होत नसल्याने महाजनकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन यांनी नुकतीच केंद्राला भेट देवून पाहणी केली.
या वीज केंद्रातील ८ आणि ९ क्रमांकाचे संच वगळता इतर पाच संच जुने होत आले आहेत. सध्या या वीज केंद्राची उत्पादन क्षमता २९२० मेगावॅट आहे. मात्र, प्रत्यक्षात वीजेचे उत्पादन निम्म्यापेक्षा कमी होत आहे. १३२६ मेगावॅट उत्पादन सुरू आहे. २१० मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक ४ हा २७ जुलैला देखभाल व दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला. तो अद्याप सुरू झालेला नाही. ५०० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक ५ मध्ये २२ मे रोजी बिघाड आला. तेव्हापासून हा संच सुद्धा बंद आहे. जनरेटरमधील बिघाडामुळे संच क्रमांक ५ हा २२ मेपासून बंद आहे. जनरेटरच्या रिवायडिंगचे काम आटोपले असून, आता टेस्टिंग सुरू आहे.
आणखी वाचा-आकाशात नवा धुमकेतू! ‘या’ दिवशी होणार दर्शन; खगोल अभ्यासकांना पर्वणी
येत्या १५ दिवसांत ५ क्रमांकाचा संच सुरू होईल. संच क्रमांक ४ हा देखभाल व दुरुस्तीसाठी काढण्यात आला. तो दोन-तीन दिवसांत सुरू होईल. जनरेटरच्या दुरुस्तीचे काम बीएचएल कंपनीकडे देण्यात आले आहे. याची पाहणी करण्यासाठी सीएमडी येऊन गेले.जनरेटरच्या दुरुस्तीचे काम बीएचएल (भेल) कडे देण्यात आले आहे. दुरुस्तीसाठी हे सुद्धा उपस्थित होते. जवळपास ४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. जनरेटरमधील बिघाड आल्यानंतर दुरुस्तीला मंजुरी मिळविण्यात बराच वेळ गेला. महिनाभरापासून दुरुस्तीचे काम सुरू आहे. संच बंद होऊन तीन महिने पेक्षा अधिक कालावधी झाला. दुरुस्तीच्या कामाला महिना लोटल्यानंतरही अजून काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नेमके सुरू काय आहे, याची मोका पाहणी करण्यासाठी महाजनकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन यांना यावे लागले.