यवतमाळ: कपाशी व सोयाबीनची वाढ होत असताना पिकांवर किडीचे आक्रमण होते. त्यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी कीटकनाशक औषधांची फवारणी करतात.

पिकांवर मिश्र औषधांची फवारणी सर्वाधिक घातक ठरत आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील नोंदीनुसार, मागील सहा वर्षांत जिल्ह्यात ९७८ शेतकरी, मजुरांना फवारणीतून विषबाधा झाली आहे. यात २०१७ मध्ये १३ तर यावर्षी दोन, अशा १५ जणांचा मृत्यू झाला आहे. यावर्षी जुलै महिन्याच्या अखेर व ऑगस्ट महिन्याची प्रारंभी फवारणीमुळे विषबाधित झालेल्या दोघांचा मृत्यू झाला. मात्र, त्याची कुठेही अधिकृत नोंद नाही. सोयाबीन व कपाशीवर किडीने आक्रमण केले आहे. त्यासाठी शेतकरी फवारणी करीत आहे.

हेही वाचा… सायबर गुन्हेगारांकडून वरिष्ठ पोलीस अधिकारीच लक्ष्य! आतापर्यंत २१ आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांचे बनावट अकाऊंट

बाधित झालेले शेतकरी उपचारासाठी चंद्रपूर नांदेड जिल्ह्यात धाव घेत असल्याने जिल्हा प्रशासनाकडे यंदाची अधिकृत आकडेवारी नाही. वैद्यकीय महाविद्यालयात यंदा एकही फवारणीबाधित शेतकरी दाखल झाला नाही. २०१७ च्या खरीप हंगामात फवरणीमुळे १३ शेतकरी, मजुरांचा मृत्यू झाला होता. तर, तब्बल ४८४ जणांना विषबाधा झाली होती. त्यामुळे तीव्र स्वरूपाच्या मिश्र औषधांसह बोगस कीटकनाशकाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर प्रशासनाने केलेल्या उपाययोजनेमुळे फवारणीच्या विषबाधेला काही प्रमाणात आळा बसला. २०२३ चा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी कीटकनाशक औषधांची फवारणी करीत आहेत.

हेही वाचा.. लॉजमध्ये देहव्यापार, चार ग्राहक सापडले ‘नको त्या अवस्थेत…’

जिल्ह्यात २०१७ मध्ये सर्वाधिक ४८४ शेतकरी, शेतमजूरांना फवारणीतून विषबाधा झाली. त्यात १३ व्यक्तींचा मृत्यू झाला होता. प्रत्यक्ष हा आकडा ३० च्या घरात होता. २०१८ मध्ये १७० जणांना विषबाधा झाली, २०१९ -१९२, २०२०-६३, २०२१- ६१, २०२२- ०८ तर २०२३ मध्ये फवारणी करताना अद्याप कोणी रूग्ण दाखल झाल्याची नोंद नाही. मात्र दोघांचा मृत्यू झाला आहे. कीटकनाशक बाधितांवर उपचार करण्यासाठी येथील वैद्यकीय महाविद्यालयात विशेष दक्षता कक्ष आहे. चालू हंगामात एकही विषबाधित रुग्ण या कक्षात उपचारासाठी दाखल झाला नसल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाकडून सांगण्यात आले.

शेतात सध्या पिकांवर मिश्र औषधेही फवारली जात आहे. फवारणी करताना सुरक्षाकिटचा कुठेही वापर होताना दिसत नाही. कृषी विभागाकडून जनजागृतीकडे कानाडोळा केला जात आहे. सुरक्षित फवारणीसाठी कृषी विभागाने बांधावर जाऊन मार्गदर्शन करणे अपेक्षित असताना केवळ कागदीघोडे नाचविण्यात येत आहे. परतीच्या पावसाच्या काळात फवारणी बाधितांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कीटकनाशकांची योग्य विल्हेवाट गरजेची

पिकांवर कीटकनाशकांचा वापर शेवटचा पर्याय म्हणून करायला पाहिजे. द्रावण तयार करताना हातमोजे, मास्क व चष्मा वापरावा. फवारणी सकाळी किंवा सायंकाळच्या सुमारास करावी. दुपारी प्रखर उन्हासह ढगाळी वातावरणात फवारणी टाळली पाहिजे. कीटकनाशकाचे रिकामे डबे, बॉटल उघड्यावर फेकू नये, त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.