यवतमाळ : दीड वर्षापासून प्रशासनाची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियमावर बोट ठेवत बेशिस्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेत गेल्या दीड वर्षांपासून पदाधिकारी, सदस्य नसल्याने विभागप्रमुख आपल्या मनमर्जीने वागत आहेत. त्यामुळे कर्मचारीही बेशिस्त झाले आहेत. विकासकामांचा खोळंबा होत असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दखल घेत शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देत सर्वांनाच ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. तूर्तास निवडणूक होण्याची कोणतीही चिन्हे नसल्याने कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करताना अडचणी येत आहे. विभागप्रमुख कधीही येतात आणि दौऱ्याचे निमित्त करून निघून जातात. कर्मचाऱ्यांकडूनही तोच कित्ता गिरविला जात होता. एकमेकांकडे बोट दाखवून वेळ मारून नेण्याचा प्रकार जिल्हा परिषदेत वाढल्याची बाब नव्याने रूजू झालेले मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या लक्षात आली. कार्यालयीन शिस्तीसाठी परिपत्रक काढून कान टोचले. फाईलचा प्रवास नियमाप्रमाणेच व्हावा, यावर विशेष भर आहे. नियमावर बोट ठेवूनच कामकाज व फाईलवर स्वाक्षरी केली जात असल्याने विभागप्रमुखांसह कर्मचाऱ्यांची दाणादाण उडत आहे. कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी आहे.

मात्र, बहुतांश कर्मचारी कधीही येतात आणि वेळेपूर्वीच निघून जातात. आता कर्मचाऱ्यांना दुपारी १ ते २ या वेळेत अर्धातास भोजनाची वेळ अंतर्भूत करण्यात आली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना महिन्यात जास्तीत जास्त दोन वेळा कार्यालयीन वेळेत दीड तास उशिरा येण्याची सवलत देण्यात आली आहे. तिसऱ्या उशिरा उपस्थितीसाठी एक नैमित्तिक रजा कापण्यात येणार आहे. परिवर्तीत रजा ही केवळ वैद्यकीय कारणास्तव मंजूर करण्यात येत असल्याने कोणत्याही परिस्थितीत उशिरा उपस्थितीसाठी ही रजा मंजूर करण्यात येणार नाही. वर्ग तीन व वर्ग चारचे कर्मचारी हे कार्यालयीन वेळेत इतर ठिकाणी आढळणार नाहीत. भोजनाच्या वेळे व्यतिरिक्त कर्मचारी कार्यालय सोडून इतरत्र आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जिल्हा परिषद नियमानुसार कार्यवाहीचा इशारा इशारा सीईओ डॉ. मैनाक घोष यांनी दिला आहे.

हेही वाचा >>>राज्यात गेल्या नऊ महिन्यात वाघाचे आठ बछडे मृत्युमुखी; वाघांची संख्या वाढली, पण मृत्युचे प्रमाणही वाढले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती बायोमॅट्रिकमध्ये न आढळल्यास शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल. कर्मचारी विनाअर्जाने, विनापरवानगीने, दौरा नोंदवहीत न करता परस्पर कार्यालय सोडून गेल्यास अनुपस्थिती विनावेतन करण्यात येणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दर्शनीय भागावर लावणे अनिवार्य करण्यात आले. वाहनचालक व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना गणवेशाचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.