अकोला : खारपाणपट्ट्यातील शापित भागात मोठी सिंचन व्यवस्था निर्माण होण्यासाठी महत्त्वाकांक्षी जिगाव सिंचन प्रकल्प उभारला जात आहे. मात्र, या सिंचन प्रकल्पाला अपेक्षित निधी प्राप्त होत नसल्याने दोन वर्ष काम लांबणीवर पडले. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची किंमत आता १७ हजार ६०५ कोटींवर पोहोचली. आतापर्यंत आठ हजार ४५८ कोटी रुपये खर्च झाले असून पहिल्या टप्प्यातील कामासाठी आणखी नऊ हजार १४७ कोटी रुपये लागणार आहेत. या वर्षीच्या अर्थसंकल्पात १२०० कोटी रुपयांची तरतूद केली. आता जून २०२७ पर्यंत प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

जिगाव प्रकल्प विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात पूर्णा नदीवर प्रगतीपथावर आहे. हा प्रकल्प तापी खोऱ्याच्या पूर्ण उपखोऱ्यात आहे. प्रकल्पाच्या माती धरणाची एकूण लांबी ८.६१ कि.मी. असून महत्तम उंची ३५.२५ मी. आहे. प्रकल्पाची एकुण साठवण क्षमता ७३६.५८ द.ल.घ.मी. असून एकूण १५ उपसा सिंचन योजना अंतर्भूत आहेत. जिगाव प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्रात वितरण व्यवस्था बंदनलिका वितरण प्रणालीद्वारे प्रस्तावित आहे.

त्याद्वारे बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील एकूण एक लाख १६ हजार ७७० हे. क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे प्रस्तावित आहे. प्रकल्पात अंशत: पाणी साठा करण्यासाठी पहिल्या टप्प्यातील कामे जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, अपुऱ्या निधीमुळे ते काम लांबणीवर पडले.

जिगाव सिंचन प्रकल्पाला निधीची मोठी अडचण आहे. प्रकल्पाला चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता २०२४-२५ मध्ये देण्यात आली असून त्यानुसार प्रकल्पाची किंमत आता तब्बल ३४ हजार ९२६ कोटींवर पोहोचली. दोन टप्प्यात प्रकल्पाच्या कामाचे नियोजन आहे. मार्च २०२५ अखेरपर्यंत प्रकल्पावर आठ हजार ८०४ कोटींचा खर्च झाला. त्यामध्ये प्रत्यक्ष कामावर तीन हजार ७४८, तर भूसंपादनावर चार हजार ७९६ कोटी आणि इतर २५९ कोटी रुपये खर्च झाले आहेत. सन २०२४-२५ मध्ये प्रकल्पावर ७६५ कोटी रुपये खर्च झाले असून आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी एक हजार २०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. प्रकल्पाची पहिल्या टप्प्याची किंमत १७ हजार ६०५ कोटी, तर दुसऱ्या टप्प्याची किंमत १७ हजार ३२१ कोटी रुपये आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यावर आठ हजार ४५८ कोटी रुपये, तर दुसऱ्या टप्प्यावर ३४६ कोटींचा खर्च झाला.

संपूर्ण प्रकल्पासाठी आणखी २६ हजार १२२ कोटींची आवश्यकता आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यासाठी नऊ हजार १४७, तर दुसऱ्या टप्प्यासाठी १६ हजार ९७५ कोटी रुपये खर्चाचे नियोजन आहे. आगामी दोन वर्षांत प्रकल्पाचा नियोजनानुसार पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी दरवर्षी साडेचार हजार कोटींचा निधी प्रकल्पाला द्यावा लागणार असल्याचे चित्र आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

…तर १८३ द.ल.घ.मी. पाणीसाठा

पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यावर प्रकल्पामध्ये १८३ द.ल.घ.मी. साठा होणार आहे. त्यामध्ये पाणी वापर सिंचनासाठी १६४ द.ल.घ.मी., पिण्यासाठी व औद्योगिक प्रत्येकी १० असे एकूण १८४ द.ल.घ.मी. पाणीसाठ्याचे नियोजन आहे. ५२ द.ल.घ.मी. पाण्याचे बाष्पीभवन होण्याचा अंदाज आहे.