तुषार धारकर

नागपूर : भीमा-कोरेगाव प्रकरणात १६ मानवाधिकार कार्यकर्त्यांना गुंतवण्यासाठी हॅकर्सच्या मदतीने खोटे पुरावे पेरण्यात आले. शासनाने या हॅकर्सची नेमणूक केली होती का, याबाबत स्पष्टता नाही. मात्र पुरावे पेरण्यात शासनाचा सक्रिय सहभाग होता, असे संकेत पुराव्यांतून मिळतात, असा खळबळजनक दावा ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मधील प्राध्यापिका आणि लेखिका अल्पा शहा यांनी त्यांच्या ‘दि इनकारसिरेशन’ या पुस्तकात केला आहे.

याबाबत ‘लोकसत्ता’शी बोलताना अल्पा शहा म्हणाल्या, ‘‘या पुस्तकाचे लेखन करताना सायबर फॉरेन्सिक तज्ज्ञांशी संवाद साधला. त्यांच्या संशोधनाचा आधार पुस्तकातील संदर्भासाठी घेतला. भारतीय व अमेरिकेच्या संशोधकांचा पुरावे पेरल्याचा दावा आहे.’’

हेही वाचा >>>रामटेकमधून काँग्रेसच्या रश्मी बर्वे निवडणूक लढणार?

१६ मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या संगणकात कृत्रिम पुरावे पेरण्यात आले. दंगलीत सक्रिय सहभाग नसतानाही त्यांना आरोपी करण्यात आले. ‘ट्रोजन हॉर्स’सारख्या सॉफ्टवेअरचा वापर करून हॅकर्सनी हे पुरावे पेरले. पुणे पोलिसांनी हॅकर्सच्या मदतीने हे कृत्य केले असण्याची शक्यता आहे. न्यायिक चौकशी केल्यावर या प्रकरणातील अनेक गुपिते उघड होऊ शकतात. मात्र सायबरतज्ज्ञांशी बोलल्यावर या प्रकरणात शासन कुठेना कुठे सहभागी आहे, हे स्पष्टपणे समोर येते, असे अल्पा शहा म्हणाल्या. जगभरात न्याय आणि समानतेसाठी लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने भीमा-कोरेगाव प्रकरणातून धडा घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>निरीक्षकांच्या अहवालानंतर ठरणार महायुतीचा उमेदवार; मुख्यमंत्र्यांनी पाठविलेल्या चमूकडून यवतमाळ-वाशीममध्ये सर्वेक्षण

हॅकर्सच्या मदतीने १६ मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या संगणकात कृत्रिम पुरावे पेरून त्यांना आरोपी करण्यात आले, असा दावा अल्पा शहा यांनी पुस्तकात केला आहे.

कोण आहेत अल्पा शहा?

अल्पा शहा या ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये मानववंशशास्त्र विषयाच्या प्राध्यापक आहेत. मानववंशशास्त्र विषयात गेल्या २० वर्षांपासून त्या संशोधन करत आहेत. राजकीय लेखनासाठी दिल्या जाणाऱ्या ऑरवेल पुरस्काराच्या अंतिम यादीत त्यांची निवड झाली होती. यापूर्वी जगभरात गाजलेले ‘नाइटमार्च’ पुस्तकही त्यांचेच.

‘हे’ सायबर युद्धच..

’पुस्तकासाठी संशोधन करताना एखाद्या ‘थरारक’ चित्रपटाप्रमाणे पुरावे समोर येत गेले. या प्रकरणात आरोपींच्या संगणकातून पुरावे मिळविल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला.

’मात्र हॅकर्सनी ई-मेलच्या माध्यमातून संगणकात शिरकाव करून त्याचा ताबा घेतला आणि पुरावे पेरले, असा दावा करीत या प्रकाराला ‘सायबर युद्धा’ची संज्ञा लेखिकेने दिली.

’भारतातील लोकशाही कसी ढासळतेय हे भीमा-कोरेगाव प्रकरणातून जगासमोर आले, अशी टिप्पणीही अल्पा शहा यांनी केली.