अमरावती : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांनी गुरूकूंज मोझरी येथे सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने मोझरी येथे दाखल होत असून मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान सोमवारी दुपारी डॉक्टरांच्या पथकाने बच्चू कडू यांची वैद्यकीय तपासणी केली.
मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळाजवळ कालपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली. बच्चू कडू यांच्यासमवेत प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि अनेक शेतकरी उपोषणात सहभागी झाले आहेत.शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, शेतमजुरांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याला विमा संरक्षण मिळावे, शेतमजुरांचे आर्थिक हित जपण्याकरिता स्वतंत्र मंडळाची उभारणी व्हावी, लागवड ते कापणीपर्यंतच्या सर्व शेतीकामांचा समावेश महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत करावा. हे शक्य नसल्यास तेलंगणाच्या धर्तीवर एकरी १० हजार रुपयांची मदत देण्यात यावी. रासायनिक खतांप्रमाणे सेंद्रिय तसेच मेंढी खतालादेखील अनुदान देण्याची तरतूद करण्यात यावी, दुधातील भेसळ रोखत गाईच्या दुधाला ५० रुपये तर म्हशीसाठी ६० रुपये प्रतिलिटर असा दर निश्चित करावा. कांद्याचे दर स्थिर राहावेत याकरिता ४० रुपये दर होईस्तोवर निर्यात बंदी लागू करू नये, या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.
रोहित पवार यांचा पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी बच्चू कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. बच्चू कडू हे आवाज नसलेल्या माणसांसाठी कायमच आवाज उठवत असतात. गेल्या दोन दिवसांपासून गुरूकूंज मोझरी येथे विविध मागण्यांसाठी त्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. त्यापैकी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी यासारखी आश्वासने तर निवडणुकीपूर्वीच सरकारने दिली आहेत. त्यामुळे राजकीय मतभेद काहीही असले, तरी त्यांच्या मागण्या या रास्त असल्याने बच्चू कडू यांच्या आंदोलनाकडे गांभिर्याने पाहून सरकारने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि बच्चू कडू यांनीही आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
कार्यकर्त्यांची गर्दी
उपोषणस्थळी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. राज्यभरातून प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते, दिव्यांग बांधव हे मोझरी येथे दाखल होत आहेत. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी नेते भेट देणार असल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.