अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी, दिव्यांगांच्या प्रश्नांवर गेल्या ८ जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. पण, आंदोलनाची दखल अद्याप सरकारने घेतली नसल्याने प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.

त्यातच शुक्रवारी प्रहारच्या एका पदाधिकाऱ्याने विष प्राशन केल्याने एकच खळबळ उडाली. या पदाधिकाऱ्यावर वरूड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अजय भागवतराव चौधरी (३५, रा. वरूड) असे विष प्राशन करणाऱ्या कार्यकर्त्याचे नाव आहे. अजय चौधरी हे प्रहारचे वरूड तालुका संपर्क प्रमुख आहेत. बच्चू कडू यांच्या आदोलनाची सरकारने दखल न घेतल्याने संतप्त होऊन चौधरी यांनी विष प्राशन केले. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बच्चू कडू यांची प्रकृती चिंताजनक

बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. बच्चू कडू यांची प्रकृती चांगलीच खालवल्याचे दिसून आले. त्यांना सकाळी उलट्या झाल्या. पण, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. कुठलीही सलाईन घेणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. बच्चू कडू यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पोटात अन्न नसल्याने त्यांच्या किडनी तसेच शरीराच्या इतर भागांवर परिणाम झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बच्चू कडू यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावण्याचा सल्ला दिला. परंतु, बच्चू कडू यांनी त्यास नकार दिला. यावेळी त्यांचे कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांना सलाईन लावण्याची विनंती केली. मात्र, मागण्या पूर्ण होईपर्यंत औषधोपचार घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्र्यांनी घेतली ऑनलाईन बैठक

बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, दिव्यांग, विधवा महिलांना ६ हजार रुपये मानधन तसेच वंचित घटकांचे प्रश्न या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी सुरू केलेल्या या आंदोलनाला राज्यभरातून अनेक नेते मंडळींनी पाठिंबा दिला आहे. अनेकांनी त्यांची भेट देखील घेतली आहे. हे आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारकडून प्रयत्न देखील केले जात आहेत. मंत्री भरत गोगावले, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री जयकुमार गोरे यांनी बच्चू कडू यांच्या मागण्यांसंदर्भात ऑनलाईन बैठक घेतली. परंतु, या बैठकीत ठोस आश्वासन मिळाले नसल्याने बच्चू कडू उपोषणावर ठाम आहेत.