अमरावती : गेल्या काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. ठाकरे बंधूंनी तसे संकेतही दिले आहेत.
‘महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. मी तुम्हाला फक्त एका वाक्यात सांगितले. याबाबत जे काही बारकावे आहेत ते आम्ही तपासून पाहत आहोत. मी तुम्हाला फक्त संदेश नाही, तर थेट बातमी देईन’, असे सूचक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर कार्यकर्त्यांमधूनही उत्स्फूर्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
अमरावतीत शुक्रवारी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत महाराष्ट्राच्या हितासाठी मनसे-शिवसेना युती झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आणि शिवसेना-मनसे युतीचा विजय असो, अशा घोषणाही दिल्या. शिवसेना आणि मनसे युती झाल्यास अमरावतीत फटाके फोडून सर्वप्रथम आम्ही जल्लोष करू, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.
शिवसेना आणि मनसे एकत्र यावे असे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला वाटत आहे. उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन भाजपने स्वत:ला मोठे केले. नंतर राज ठाकरे यांचा वापर केला. राज ठाकरे यांच्या घराच्या पायऱ्या भाजपच्या नेत्यांनी झिजवल्या, पण हा ठाकरे ब्रँड आहे, हे भाजपने विसरू नये. युतीसंदर्भात उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असे शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी यांनी सांगितले.
महाराष्ट्रात केवळ ठाकरे ब्रँड चालतो, हे महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिले आहे. भाजपने गेल्या पंचवीस वर्षांत बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा वापर केला. त्यांच्या सभांच्या माध्यमातून जनमत गोळा केले. ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, ही जनतेची इच्छा आहे. ज्या क्षणी मनसे-शिवसेना युतीची घोषणा होईल, त्या क्षणी अमरावतीत शिवसैनिक आणि मनसेचे कार्यकर्ते फटाके फोडून जल्लोष साजरा करतील, असे शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख पराग गुडधे यांनी सांगितले.
भाजपचे हिंदुत्व हे खोटे आहे. खरे हिंदुत्व ठाकरे बंधूंनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. शिवसेना आणि मनसे यांच्यात युती व्हावी, ही जनतेची इच्छा आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही युती होणे महत्वाचे आहे. ठाकरे बंधू एकत्र आले, तर हे पक्ष कुठेही राहणार नाहीत, असे मनसेचे महानगरप्रमुख धीरज तायडे यांनी सांगितले.