अमरावती : उमेदवारी अर्ज भरून माघारीची घोषणा केल्‍यानंतर नवीन घटनाक्रमात रिपब्लिकन सेनेचे अध्‍यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी अखेर अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्‍याचा निर्णय घेतला आहे. येथील पत्रकार परिषदेत आनंदराज आंबेडकर यांनी निवडणूक लढण्‍याची घोषणा केली. वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि इतर मित्र पक्षांचा आपल्‍याला पाठिंबा असल्‍याचा दावा त्‍यांनी केला.

आनंदराज आंबेडकर यांनी गेल्‍या २ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण, वंचित बहुजन आघाडीने त्‍यांना पाठिंबा जाहीर करण्‍यास उशीर केल्‍याने त्‍यांनी निवडणुकीतून माघार घेण्‍याची घोषणा केली होती. ४ एप्रिलला वंचित बहुजन आघाडीने उमेदवार रिंगणात न उतरविण्‍याचा निर्णय घेऊन आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला. तरीही आनंदराज आंबेडकर हे नाराज होते. आपल्‍या नामांकन रॅलीत वंचित बहुजन आघाडीच्‍या कार्यकर्त्‍यांनी सहभागी होऊ नये, यासाठी प्रदेश पदाधिकाऱ्यांनी तंबी दिल्‍याचा आरोपही आंबेडकर यांनी केला होता.

हेही वाचा…भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचे निर्देश, ‘अर्ज मागे घेऊन युतीधर्माचे पालन करा’ तर बंडखोर विजयराज शिंदे म्हणतात…

आंबेडकरी अनुयायांनी गेल्‍या दोन दिवसांत आपण निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला. अनेकांनी तर आत्‍मदहन करू, असा इशारा दिला. आंबेडकरी जनतेचा आक्रोश पाहून त्‍यांच्‍या भावनेचा आदर राखून आपण निवडणूक लढण्‍याचा निर्णय घेतला आहे, असे आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आज कॉंग्रेसचे अनेक नेते भाजपमध्‍ये जात आहेत. पण, आम्‍ही कधीही भाजपच्‍या भूलथापांना बळी पडणार नाही, असे ठामपणे सांगू शकतो. आज देशात लोकशाही धोक्‍यात आली आहे. अमरावती विभागाचे प्रश्‍न संसदेत प्रभावीपणे मांडण्‍यासाठी आणि आंबेडकरी विचारांच्‍या जनतेचे प्रतिनिधित्‍व करण्‍याच्‍या दृष्‍टीने आपली उमेदवारी आहे, असे आनंदराज आंबेडकर म्‍हणाले.

हेही वाचा…भूसंपादनावरून संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई , प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्ते व नेत्यांनाही परत पाठवले

आपले कार्यक्षेत्र हे प्रामुख्‍याने मुंबई असले, तरी या भागातील प्रश्‍नांची आपल्‍याला जाण आहे. राहुल गांधी हे केरळमधून निवडणूक लढवू शकतात, तर मी अमरावतीतून का नाही, असा सवाल आनंदराज आंबेडकर यांनी केला. आंबेडकरी समाजाला न्‍याय मिळवून देण्‍यासाठी, राजकीय क्षेत्रातील काही लोकांची मक्‍तेदारी मोडून काढण्‍यासाठी आपली उमेदवारी आहे. धर्मांध शक्‍ती डोके वर काढत असताना आता सर्व समाजाने एकत्र आले पाहिजे, असे आंबेडकर म्‍हणाले.