नागपूर: देशातील चार राज्याच्या विधानसभा निवडणुकीपैकी काँग्रेसने तेलंगणा राज्यात पक्षाचा तिरंगा दिमाखाने फडकवला. महाराष्ट्राच्या विशेषत: विदर्भाला लागून असलेल्या या प्रदेशातील निवडणुकीचे व्यवस्थापन सुत्र महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते व माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्याकडे होते. त्यांच्या नेतृत्वात पक्षााला बहुमत मिळाल्याने ठाकरे यांचे पक्षात राजकीय वजन वाढले आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी महाराष्ट्रात पक्ष विस्तार सुरू केला होता. त्यासाठी त्यांनी प्रथम विदर्भावर लक्ष केंद्रीत केले होते. त्यांना कसे रोखावे असा प्रश्न महाराष्ट्रात काँग्रेसपुढे होता. मात्र तेलंगणा विधानसभा निवडणुकीतलच केसीआर यांचा पक्ष पराभूत झाला. त्यामुळे त्यांच्या बीआरएस पक्षाच्या विस्तारावर मर्यादा येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने या पक्षाला विदर्भाच्या सीमेवरच रोखण्यात यश मिळवल्याचे तेलंगणातील निवडणूक निकालाच्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा… मनोरुग्ण झाडावर चढला अन् वीरूगिरी करू लागला

११९ जागांपैकी ६५ जागा जिंकून काँग्रेसने तेलंगणात एक हाती बहुमत मिळवले. केसीआर सरकारने पुन्हा सत्तेत येण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावली होती. मात्र अनेक निवडणुका लढण्याचा अनुभव पाठीशी असलेल्या माणिकराव ठाकरे यांनी तेलंगणातील काँग्रेस नेत्यांमध्ये एकजूट घडवून आणली व प्रचार कार्याला गती दिली. उमेदवार ठरवताना बंडखोरी होऊ नये याची काळजी घेतली. विशेष म्हणजे ठाकरे यांना अ.भा. काँग्रेस समितीनेही पूर्णपणे निर्णय घेण्याबाबत मोकळिक दिली होती. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सभांना मिळणारा लोकांचा प्रतिसाद पाहूनच या निवडणुकीत लोकांचा पाठिंबा काँग्रेसला मिळेल, असे वाटत होते. त्याचे प्रतिबिंब निकालातून दिसल्याचे काँग्रेस नेते सांगतात.

हेही वाचा… नागपुरात भाजपचा जल्लोष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेलंगणाच्या निवडणूक निकालामुळे या राज्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांचे पक्षश्रेष्ठींपुढे राजकीय वजन वाढण्याची शक्यता आहे. पुढच्या काळात महाराष्ट्रातही लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे पक्षाकडून महत्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.