नागपूर : शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील शासकीय निवासस्थान ‘रामगिरी’वर ट्रॅक्टर मोर्चा घेऊन जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

बच्चू कडू यांच्या या इशाऱ्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून रामगिरी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. परिसरात अतिरिक्त पोलीस तैनात करून कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना हमीभाव, वीजबिल माफी, पीकविमा आणि नुकसान भरपाई यांसारख्या प्रमुख मागण्यांबाबत शासनाने तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी कडू यांनी केली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तीव्र होत असताना कडू यांच्या या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे राजकीय वर्तुळात हालचाली वाढल्या आहेत. शासनाकडून यावर कोणती भूमिका घेतली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आंदोलक वर्धा येथून बुटीबोरीकडे निघाले आहेत. रॅलीत हजारो ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि मेंढपाळ बांधवांचा सहभाग आहे. आंदोलनासाठी अन्नसामुग्रीची मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. सोलापूरहून २० हजार भाकऱ्या, मिरची आणि शेंगदाण्याचा खरडा, नाशिकहून कांदा व भाजीपाला, लातूरहून तूरडाळ, तसेच इतर भागांतून हुरडा व अन्नधान्य नागपूरकडे रवाना झाले आहे.

दरम्यान आंदोलन दुपारी ४ वाजेपर्यंत नागपूर सीमेवर मंत्री यांची प्रतीक्षा करणार आहेत. राज्य शासनाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यास हा ट्रॅक्टर मोर्चा मुख्यमंत्र्याचे शासकीय निवासस्थान रामगिरीकडे कुच करणार आहे, अशी माहिती आंदोलकांनी दिली आहे.

गावोगावी चिवडा बनवण्याचे काम सुरू असून संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र या आंदोलनासाठी सज्ज असल्याचे सांगितले जात आहे. ‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू’ अशी घोषणा देऊन सत्तेत आलेल्या सरकारने आजवर शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे. ना कर्जमाफी, ना हमीभाव- उलट केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात-निर्यात धोरणामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. कापसाची आयात वाढल्याने देशांतर्गत भाव घसरले, तर सोयाबीनचा किमान आधारभूत भाव ५ हजार ३३५ रुपये असूनही शेतकऱ्यांना ५०० ते ३ हजार दरम्यानच विक्री करावी लागते, ‘हा कोणता आत्मनिर्भर भारत?’ असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

वर्धा मार्गावर वाहतूक व्यवस्थेत बदल

वर्धा मार्गावरील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या बाजूच्या मोकळ्या मैदानात आंदोलन होणार आहे. त्यामुळे वर्धेकडून येणारी वाहतूक जामठा चौकीवरून एनसीआयकडे वळवली. तेथून यू-टर्न घेऊन वाहने सिमेंट फॅक्टरी, डीपीएस स्कूल टी पॉईंटमार्गे उजवे वळण घेत मिहान डब्ल्यू बिल्डिंगवरून पुलाखाली उतरून इंडियन ऑईल कंपनी व खापरी पोलिस चौकीमार्गे नागपूरकडे जातील. खापरी पोलिस चौकीसमोरून डावे वळून सेझ मिहान पुलाच्या सर्विस रोडने, हॉटेल ले मेरीडियन व पांजरा गाव मार्गे आऊटर रिंगरोड पुलावरून उजवे वळण घेत वर्धेकडे जातील.