अमरावती : पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला, तेव्हा त्यांनी तेथील पर्यटकांना धर्म विचारला. इतर कोणतीही जात विचारली नाही. त्यांनी लोकांना कलमा वाचण्यास सांगितले. हिंदूंची अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर आम्ही दिले आहे. पण, देशात आता गीता विरूद्ध कलमा असा वाद निर्माण झाला आहे. त्यांना देशात कलमा हव्या आहेत. आम्ही डोक्यावर गोळी घेऊ, पण कलमा वाचणार नाही, असे वक्तव्य भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी शनिवारी येथे केले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत परिणय बंध लॉनमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. नवनीत राणा म्हणाल्या, हिंदुस्थानात राहणाऱ्या सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे. जेव्हा आम्ही तिरंगा यात्रा काढली, तेव्हा ही भाजपची तिरंगा यात्रा आहे, असे म्हटले गेले. काँग्रेसचे लोक तिरंगा हाती घेण्यास तयार नव्हते. त्यांना अजूनही पाकिस्तानविषयी प्रेम आहे. दहतशतवाद्यांनी ज्या लोकांना गोळ्या घातल्या, ते काही भाजपचे लोक नव्हते. या दहशतवादी हल्ल्याचा सूड घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवनीत राणा म्हणाल्या, जेव्हा अमरावतीत दंगल झाली, तेव्हा हिंदू लोकांना सर्वाधिक झळ पोहचली. हिंदू कुटुंबांमध्ये एकेकच मुलगा आहे, तर त्यांच्या वस्त्यांमध्ये झुंडशाही आहे. पण, आमचे लोक शंभरावर भारी आहेत, हे त्यांनी विसरू नये. येणाऱ्या काळात बकरी इद हा सण येणार आहे. यावेळी काही वस्त्यांमध्ये घराच्या मागे गायीचे वासरू बांधलेले दिसते. नाल्यांमधून रक्ताचे वाट वाहतात, बकरी इद हे नाव, पण गायीचे वासरू कापले जाते. पण आता मात्र हे कुठल्याही परिस्थितीत होऊ दिले जाणार नाही. पालकमंत्री या नात्याने चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनालाा सूचना द्याव्यात. हिंदू संघटनांचे कार्यकर्ते बारकाईने लक्ष ठेवून आहेत. यावेळी गायीचे वासरू कुठल्याही परिस्थितीत कापले जाणार नाही, असा बंदोबस्त करू, काँग्रेसचे नेतृत्व शहरात असताना गायीचे वासरू कापण्याचे प्रकार घडत होते, पण ते आता होऊ दिले जाणार नाही, असे नवनीत राणा म्हणाल्या.नवनीत राणा म्हणाल्या, भाजप हा विचारांवर चालणारा पक्ष आहे. या पक्षात नेमणुका या गुणवत्तेच्या आधारावर केल्या जातात, शिफारशींवर नाही.