नागपूर : आदर्श आचार संहिता आणि कलम १४४ लागू असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या निवासस्थापुढे निदर्शने केली होती. पुतळा जाळला होता. या घटनेची विलास मुत्तेमवार यांनी भारतीय निवडणूक आयोग, नागपूर जिल्हा निवडणूक अधिकारी आणि अंबाझरी पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे.

लोकसभा निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली. या अनुषंघाने नागपूर पोलिस आयुक्तांनीही १७ मार्च २०२४ रोजी कलम १४४ लागू केली. तरीही ५ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवासस्थानाजवळ गोंधळ घातला.

हेही वाचा…‘समृद्धी’वर मालवाहू वाहनांची धडक; चालक जागीच ठार, तिघे गंभीर

भाजपचे अधिकृत उमेदवार नितीन गडकरी यांच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या. जवळपास तासभर हा सर्व प्रकार घडल्यावरही पोलीस मुकदर्शकाच्या भूमिकेत होते. या घटनेची माहिती वेळेपूर्वीच पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी दूरध्वनीवर दिली होती, अशी तक्रार मुत्तेमवार यांनी केली आहे. तसेच लोकप्रतिनिधी कायदा, भादवि, आचारसंहिता कायदा, आणि सीआरपीसीनुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणीही मुत्तेमवार यांनी केली आहे.